Tuesday, 18 June 2024

छोडो कल कि बाते …

 छोडो कल कि बाते - ह्या हम हिंदुस्थानी सिनेमातल्या गाण्यावर फेसबुक वर त्या गाण्याबद्दल आणि त्यावेळच्या काळाबद्दल एक पोस्ट आली होती त्यावरून मला सुचलेले काही विचार…

स्वातंत्र्य नुकतेच मिळालेले. नवीन भारत घडवण्याची जिद्द सर्वांच्याच मनात. धरणे, पूल, तलाव, नव्या शासकीय इमारती बांधल्या जाऊ लागलेल्या होत्या; हरित क्रान्ती येऊ घातलेली, औद्योगिकरणाची सुरुवात झालेली, बँका आणि विमा कंपनीचे राष्ट्रीयकरण झालेले,  कृषिप्रधान भारत देश विकनशील होण्यासाठी पावले टाकणारा, प्रजासत्ताक होऊ घातलेला,  शिस्तप्रिय जनता आणि जागरूक नागरिक होण्याची जाणीव ठेऊन नव्या उमेदी, नव्या आशा, नवी स्वप्ने त्यावेळची पिढी पाहात होती ते हे सारे ह्या गाण्यांत सामावलेले आहे. त्यावेळी प्रगती वाटणारे औद्योगिकरण/वाढणारी वाहने आणि दळणवळण  पुढे जाऊन प्रदूषणाचा राक्षस उभा करणार हे कोणाला माहीत होते? हरित क्रांती मध्ये  रसायनांचा खते म्हणून  होणारा अतिरेकी वापर आरोग्यास अपाय करेल असा विचार त्यावेळी स्वप्नात सुद्धा आला नसेल. त्यावेळी गाण्यांत वर्णन केलेला भारत खरोखरीच तसा घडला का? स्वातंत्र्यानंतर किती नवी धरणे बांधली? किती नवीन ताजमहाल/कुतुबमिनार/शासकीय इमारती उभारल्या? किती वर्षे लागली नवे मोठे रस्ते बनवायला? रेल्वे चे नवे जाळे तयार केले का? गावे आणि शहरे रेल्वे आणि रस्त्यानी जोडून जवळ आणली का? शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली का कोलमडून  पाडली? 

एवढा मोठा देशाचा समुद्रकिनारा असतांना किनाऱ्यावरची शहरे जलवाहतुकीने का जोडली नाहीत? कोस्टल रोड ची कल्पना आधी का सुचली नाही. कित्येक नवीन पूल, रस्ते आणि प्रकल्प वेळेत का कार्यान्वित केले नाहीत? त्यांना वेळ का लावला? मेट्रो आणि बुलेट ट्रेन सारख्या वाहतूक व्यवस्था उशिरा का आणल्या गेल्या? शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल का केला गेला नाही? शिक्षण देण्यासाठी शाळा आणि कॉलेजे कारखान्यासारखी का काढली? ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था का पांगळी ठेवली? करोना काळात ग्रामी  सोडा शहरातली आरोग्य व्यवस्थेची पूर्ण वाताहत झाली होती. राज्यकर्ते सेवक होते ते जनतेचे मालक कधी बनले? स्विस बँकेत आपल्या देशाची संपत्ती कोणी भरली? भ्रष्टाचार कधी शिरला आणि शिष्टाचार कधी झाला? पोलीस आणि इतर सरकारी खात्यात चिरीमिरी द्यावीच लागणार मानसिक अवस्था आपण कधी स्वीकारली? सरकारी कार्यालयातील कार्यक्षमता वाढली का? कठोर परिश्रमास पर्याय नाही सारखी घोषवाक्ये का लिहावी लागतात? किती नागरिक शिस्त पाळतात- रांगेत उभे रहाताना, रस्त्यावर चालतांना किंवा वाहन चालवतांना? डोनेशन घेऊन ऍडमिशन ची समांतर यंत्रणा का उभी  केली गेली? जातीयवाद / धर्मवाद का पोसला गेला? नोकरी आणि शिक्षणात आरक्षण आणून कार्यक्षम आणि योग्यता असणाऱ्या तरुणांची घुसमट का केली गेली? त्यांना नैराशेच्या गर्तेत का घातले गेले? तरुणांनी प्रायव्हेट नोकऱ्याना प्राधान्य का दिले? मधली एक चांगली शिकलेली पिढी युरोप आणि अमेरिकेला का गेली? हम हिंदुस्थानी गाण्यांत  वर्णिलेला हिंदुस्थान आणि आज चा हिन्दुस्थान ह्यात किती फरक आहे ते तुमीच ठरवा 

Prakash Sawant
19 June 2024

Saturday, 8 June 2024

काजवा महोत्सव

 काजवा महोत्सव. याचे आयोजन केल्याची बातमी वाचली. लहानपणी जे आपल्या गावी गेले असतील आणि आजही जे गावांत राहात असतील त्यांच्यासाठी याचे काही विशेष वाटणार नाही. आम्ही लहानपणी मे महिन्यात कोकणांत गावी जात असू. शाळा जून च्या पंधरवड्यात सुरु होत असल्यामुळे मिरगा पर्यंत (मृग नक्षत्र लागेपर्यंत) गांवी मुक्काम असायचा. वैशाख संपून ज्येष्ठ महिना चालू होण्याचा हा कालावधी! वैशाख वणवा थांबण्याचा आणि पाऊसाचा शिडकावा सुरु होण्याचा हा काळ. धान्य साठवणे, लाकूडफाटा जमा करून ठेवणे, घर शाकारणे, झड्या बांधणे अशी कामे नुकतीच हातावेगळी केलेली असायची. वातावरण कुंद झालेले. वेगवेगळे कीटक दिसू लागायचे. उडणाऱ्या मुंग्या दिसायच्या आणि पावसाळा जवळ आल्याची चाहूल लागायची. आणि रात्री काजवे दिसू लागायचे. अंधारात एखादा काजवा चमकत जायचा आणि आम्हा मुलांचे लक्ष वेधायचा. किती अप्रूप वाटायचे. जसा पावसाळा जवळ यायचा तसे समोरचे भेंडी चे झाड काजव्यांनी भरून जायचे. आजू आजुबाजीची झाडे आंब्याची, फणसाची, जांभळाची चमचमणाऱ्या काजव्यांनी भरून जायची. त्या गूढ अंधारात (त्यावेळी गावांत लाईट न्हवती) भीती च्या अंमळ अंमलाखाली डोळ्यांचे पारणे फेडणारा हा काजवा महोत्सव अंगावर शहारा आणायचा, मन थक्क करून टाकायचा. रात्री गावांत फिरतांना काजव्यांच्या प्रकाशानी चमचमणारी झाडे मंद दिव्यांची रोषणाई केल्यासारखी वाटायची. काजवे एवढे असायचे की त्यातले काही उडत उडत घरात यायचे. त्यांना हातावर घेऊन पाहतांना खूप मजा यायची. जास्तीचे काजवे मग आम्ही मुले काचेच्या बाटलीत भरायचो आणि ती बाटली अंधाऱ्या खोलीत नेऊन तिचा बॅटरी सारखा वापर करता येईल का ते पाहायचो. सकाळी बाटली उघडून पाहायचो तर काही काजवे मेलेले असायचे आणि काही काजव्यांच्या उजेडाचे तेज कमी झालेले असायचे - अशा काजव्यांना आम्ही सोडून द्यायचो. पुढे रोज रात्री काही दिवस हा काजवा महोत्सव आम्ही रोज पाहायचो.  मुंबई ला गेल्यावर काजव्यांनी फुललेली झाडे आठवत राहायची. आताही कधी मधी काजवे दिसतात पण लहानपणी पाहिलेले काजवे आणि त्यांचा मंद प्रकाश आणि रात्रीच्या अंधारात त्या मंद प्रकाशात झाडे चमकवणारे काजवे - ते गूढरम्य वातावरण, तो काजवा महोत्सव अजून विसरलो नाही आणि त्याची सर आता आयोजित केलेल्या काजवा महोत्सवाला येणार नाही हे नक्कीच. 

  • प्रकाश दिगंबर सावंत  08 June 2024

Thursday, 14 September 2023

मुंबई ची डबल डेकर

 मुंबईत डबल डेकर बस बंद होणार अशी बातमी वाचण्यात आली. ८६ वर्षापूर्वी म्हणजे १९३७-३८ च्या दरम्यान जेव्हा डबल डेकर सुरु झाली असेल त्यावेळी तिचे काय अप्रूप असेल ? आम्ही लहान असतांना पण डबल डेकर चे खूप आकर्षण वाटायचे. बऱ्याचदा मोठ्या माणसांबरोबर डबल डेकर मध्ये बसायचा योग्य आला पण तो खालच्या डेकवर- ही मोठी माणसे वर का चढत नाहीत नाहीत बसच्या वरच्या मजल्यावर अशी खंत वाटायची आणि त्यांचा रागही यायचा. एकदा हा योग्य आला. खालचा डेक भरलेला असल्याने कंडक्टर वर जा वर जा असे ओरडत होता त्यामुळे वरच्या मजल्यावर जायचा चान्स एकदाचा मिळाला. वरचा मजला हवेशीर वाटला. वरून खाली पाहायला मजा वाटत होती. ड्रायव्हर च्या वर तर सीट्स होत्या. अरे वरच्या मजल्याचा ड्रायव्हर कुठे गेला असे मी विचारलेले आठवते. त्याबरोबर बाजूच्या सीटवर बसलेली माणसे का हसली ते मला कळले नाही पण माझ्या डोक्यावर काकांनी टपली मारली- म्हणाले ड्रायव्हर खालीच असतो. पण त्यावेळी बालमनाला वर ड्रॉयव्हर का नाही हा त्यावेळी पडलेला मोठा प्रश्न अजूनही मला आठवतो. त्यानंतर थोडे मोठा झाल्यावर शाळेत जाताना मी एकट्याने प्रवास करू लागलो. त्यावेळी मी वरच्या मजल्यावर बसायलाच प्राधान्य द्यायचो. वरच्या मजल्यावर आवडीची सीट म्हणजे ड्रायव्हर च्या वरची सीट. तेथे बसून समोरून येणारी हवा खात समोर दिसणारी दृश्य पाहात प्रवास करायला मजा यायची. शाळेतील मित्र जर वरच्या सीटवर बसले तर मग वेगळोच धमाल. एखादा मस्तीखोर तर हॅन्डल फिरवून नंबर बदलायचा किंवा प्रवास दर्शक फिरवायचा. नंबर बदलला तर वरून पुढच्या स्टॉप वर चढणाऱ्या प्रवाशांचा बसकडे (भलताच नंबर दिसल्याने) बघताना होणार गोंधळ बघून एक वेगळीच फीलिंग यायची. मग आमच्यातला एखादा दोन तीन स्टॉप गेल्यावर परत हॅन्डल फिरवून मूळ नंबर आणून ठेवायचा. डबल डेकर मध्ये खाली बसायचे असेल तर माझी आवडती सीट होती बस मध्ये चढल्यावर डावीकडे आणणारी आडवी सीट. ह्या सीट च्या खिडकी कडे बसायचे आणि गर्दी नसेल तर बस च्या मागे पळणारा रस्ता पहात राहायचा. ह्या सीट वर चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या माणसांच्या असंख्य व्यक्तिरेखा बघायला मिळायच्या. रांगेतुन येऊन चढणारे, काही शेवटच्या क्षणी उडी मारून पकडणारे, सिग्नल ला बस थांबल्यावर चढण्याचा चान्स घेणारे, काही सिग्नल ला चढल्याचे कंडक्टर च्या ध्यानात आल्यावर अपमानित करून उतरवले जाणारे, कुटुंबकबिल्यासोबत चढण्याची धडपड करणारे, घुसखोरी करून चढणारे टगे, प्रवाशांची आपसातली भांडणे, प्रवाशांची कंडक्टर बरोबरची भांडणे, बस रिकामी असूनही जिन्या जवळच्या हॅन्डल ला पकडून बस च्या फुटबोर्ड वर उभे राहून प्रवास करणारे, प्रवाशांची आपसातली सामान- भाजी- लगेज घेऊन ते दरवाज्या जवळच्या सामानाच्या पिंजऱ्यात ठेऊन प्रवास करणारे (त्यावेळी बसमध्ये सामान ठेवण्यासाठी पिंजरे असायचे आणि अधिकृत पणे सामान नेता यायचे- पुढे हे पिंजरे बंद केले आणि नुसती मोकळी जागा ठेवली गेली), दरवाजात चढून तेथेच उभे राहून दोन स्टॉप गेल्यावर तिकीट न काढता उतरणारे  फुकटे ... असे किती तरी अनुभव डबल डेकर च्या बस ने दिले ... 

वरच्या आणि खालच्या कंडक्टर  चे वेगळेच को-ऑर्डिनेशन असायचे. वरून उतरणारे बरेच पॅसेंजर्स असतील तर वरचा कंडक्टर सिंगल बेल मारायचा आणि पँसेंजर्स जिना उतरून खाली गेले कि डबल बेल मारायचा. वरच्या आणि खालच्या कंडक्टर चे जर जमत नसेल किंवा पटत नसेल तर हा ताळमेळ विस्कटून जायचा. सहसा वरच्या मजल्यावर स्टँडिंग प्रवाशी ठेवायला अनुमती न्हवती पण खूप गर्दी असेल तर मात्र वरच्या मजल्यावर उभे प्रवाशी घेतले जायचे. 


आज डबल डेकर बंद होणार ही बातमी वाचल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. डबल डेकर मुंबई ची शान होती, मुंबई ची एल वेगळी ओळख होती.. आता ती मिटली जाणार हे ऐकून आपल्या आयुष्यातील एक वेगळे पर्व संपल्यासारखी जाणीव होतेय हे तेवढेच खरे ... 

Prakash Sawant

14 Sep 2023

Thursday, 2 March 2023

रेडिओ दिनाच्या निमित्ताने

रेडिओ एके काळी सर्वांच्या जीवनाचा - मनोरंजनाचा अविभाज्य भाग होता.  त्याकाळी रेडिओ वाल्व चे होते त्यामुळे त्यांचा आकार मोठा असायांचा. बहुतेक घरात रेडिओ उंचावर कपाटावर अथवा भिंतीवर फळी मारून (लहान मुलांनी हात लावू नये म्हणून) वर ठेवलेला असायचा. रेडिओ ला शोभा यावी म्हणून खास वेलवेट चे कापड बाहेरून लावलेले असायचे. रेडिओ चार बँड चा असायचा - काटा फिरवून  स्टेशन ट्यून झाले की नाही ते कळण्यासाठी एका काचेच्या गॅप मध्ये “हिरवा दिवा" असायचा - दोन हिरवे बँड एकत्र झाले की स्टेशन लागले ह्याची खातरजमा व्हायची. रेडिओ सुरु केल्यावर दोन ते पाच मिनिटांनी लागायचा. वाल्व गरम व्हायला वेळ लागायचा. पुढे डायोड आले. रेडिओ चा आकार कमी झाला. गळ्यात घालायचे ट्रांझिस्टर आले आणि नंतर खिशात घेऊन जायचे पॉकेट रेडिओ आले. रेडिओ चे कार्यक्रम वर्तमानपत्रात दिले जायचे. रेडिओ टाइम वर लोकांच्या वेळा लावल्या जायच्या. रेडिओवर दिली गेलेली बातमी ऑथेंटिक समजली जायची. एखाद्याचा रेडिओ वर कार्यक्रम असला की त्याची कॉलर एकदम कडक होऊन जायची. 


मराठी कार्यक्रमांमध्ये: पहाटेची भक्ती गीते (त्यात ‘माटी कहे कुम्हार से’हे गाणे हमखास असायचे), पुन्हा प्रपंच (ज्यात तत्कालीन घडामोडींवर भाष्य असायचे), कामगार सभा (विशेषतः शनिवारी लोकगीते आमी कोळीगीते लागायची), लहान मुलांसाठी गम्मत जम्मत कार्यक्रम, रात्री श्रुतिका, आपली आवड (ह्यात आपण सांगितलेले गाणे लावतात का आणि आपले नाव घेतात का ह्याची उत्सुकता जास्त असायची). 


हिंदी कार्यक्रमांमध्ये: विविध भारती  वरील छायागीत, भुले बिसरे गीत, इनसे मिलीये आणि जयमाला हे विशेष कार्यक्रम आवडीने ऐकले जात. शनिवारी एखादी प्रसिद्ध व्यक्ती जयमाला सादर करायची - सुनील गावस्कर, अमिताभ बच्चन, करसन घावरी, धर्मेंद्र ह्यांच्या जयमाला ऐकलेल्या आठवतात. त्याकाळी व्हिडीओ नसल्याने सिनेमा प्रमोशन साठी लावले जाणारे प्रायोजित कार्यक्रम आवर्जून ऐकले जायचे. हवा महल ची विशेष ट्यून लागली की समजायचे की सव्वा नऊ वाजलेत आणि साडेनऊ पासून दहा वाजे पर्यंत प्रायोजित कार्यक्रम लागणार आहेत आणि दहा वाजता छायागीत. रविवारी  एखाद्या चित्रपटाचा साऊंड ट्रॅक लावला जायचा. जुन्या गाण्यांसाठी ऑल इंडिया रेडिओ ची उर्दू सर्व्हिस लावली जायची आणि बुधवारी बिनाका गीतमाला साठी रेडिओ सिलोन! अधून मधून अहमदाबाद बडोदा स्टेशन लावले जायचे.  क्रिकेट चालू असताना तर शाळा कॉलेज अभ्यास विसरून रेडिओला वेढा घालून बसले जायचे 


मध्यंतरी कॅसेट प्लेयर आले, सी डी प्लेयर आले, व्ही सी डी आले त्याबेली रेडिओ ची प्रसिद्धी कमी झाली. लोकांनी कार मध्ये कॅसेट / सी डी प्लेयर लावून घेतले. लोकांचे दुर्लक्ष झाले. रेडिओ विस्मृतीत जाऊन इतिहास जमा होतो की काय असे वाटायला लागले. पण पुढे एफ एम सुरु झाले. रेडिओ ने कात टाकली. कार मध्ये आता लोकं रेडिओ ऐकू लागलेत. मोबाईल मध्ये रेडिओ ट्यून केला जाऊ शकतो. वेगवेगळी रेडिओ ची ऍप  आलीत. इंटरनेट वर पण रेडिओ ट्यून करू शकतो. पूर्वीइतका पॉप्युलर नाही पण रेडिओ पुनर्जीवित झाला आहे हे ही नसे थोडके !

प्रकाश दिगंबर सावंत 

०२ मार्च २०२३ 


Sunday, 19 February 2023

मला आवडलेले पुस्तक - काळोख आणि पाणी (अरुणा ढेरे लिखित)

महाभारतात नाही ते जगांत नाही असे म्हणतात - "काळोख आणि पाणी" ह्या श्रीमती अरुणा ढेरे लिखित पुस्तकात मानवी स्वभावाचे अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत. उत्तुंग वाटणाऱ्या व्यक्तिमत्वांची पावले शेवटी मातीचीच होती हे प्रकर्षाने जाणवते. ह्या संग्रहात अनेक अशा कथा आल्या आहेत ज्या कधी ऐकल्या अथवा वाचल्या न्हवत्या. कधी तरी आजी च्या तोंडून "आज शेषाची पाळी" ची कथा ऐकलेली अंधुकशी आठवते. महाभारत, त्यातील व्यक्तिरेखा, त्यांच्या वर्तवणुकीचे विश्लेषण, त्यांच्या वर्तवणुकीची जनमानसावर पडलेली छाप आणि त्यातून जन्मलेल्या (आपण न वाचलेल्या) कथा ह्या पुस्तकात दिलेल्या आहेत ज्या आपणाला अंतर्मुख करून सोडतात. गांधारीची धृतराष्ट्र आणि दुर्योधनामध्ये होणारी कुचंबणा, धृतराष्ट्राचा अप्पलपोटेपणा, भीष्मांची स्त्रियांबद्दलची निरीच्छ वृत्ती. दुर्योधनाचा युद्धाच्या शेवटी त्याला जाणवलेला एकाकीपणा, रितेपण आणि ऐन युद्धाच्या समरप्रसंगी आलेली निरागस बालपणाची आठवण - त्यांचे कौरव पांडवांचे एकत्र खेळण्याचे चांगले दिवस त्याला आठवतात तो क्षण आपणाला पण हळवे करून सोडतो, जीवन संघर्षाचा फोलपणा जाणवून देतो. कितीतरी असे पैलू ह्यात वाचायला मिळतात. आदिमायेची रक्ताची आस, तिची द्रौपदी शी जोडलेली नाळ आणि कृष्णाच्या पायाला बाण लागून अवतारपूर्ती च्या वेळी सांडलेला रक्ताचा थेंब त्या आदिमायेच्या रक्ताची आस पूर्ण करणार आहे काय? विशेष करून "कुंतीचा नातू" ही कथा वेगळाच आशय मांडून आपणाला जीवनाचे तत्वज्ञान सांगून जाते
- प्रकाश दिगंबर सावंत 
- १० फेब्रुवारी २०२३ 

Wednesday, 16 February 2022

मोडी लिपी - एक आठवण

 लहानपणी कोकणात मे महिन्याच्या सुट्टीत गावी जायचो. त्यावेळी अगदी बारावी पास होईपर्यंत मी गावाला जायचो. ऐंशी च्या दशकापर्यंत गावाकडे लाईट न्हवती. त्यामुळे रात्री बैठे खेळ दिव्याच्या अथवा कंदिलाच्या उजेडात खेळले जायचे नाहीतर एखादे गोष्टीचे पुस्तक वाचले जायचे. नऊ च्या दरम्यान जेवण खान आटपून दहापर्यंत झोपी जायचो. गावाकडे पहिले काही दिवस नव्या नवलाई प्रमाणे आसपास फिरण्यात आणि भेटीगाठी करण्यात जायचे. मुंबई ला परते पर्यंत मधला काळ मग फडताळे शोध, पेट्या शोध, पोटमाळे शोध असे करण्यात जायचे. अशा वेळी जुने पुराणे कागदपत्रे हाती लागायची. मला आठवते जुन्या पिवळ्या पडलेल्या वह्या, खतावण्या हाती लागल्या होत्या. त्या म्हणे माझ्या आजोबांनी आणि पणजोबा – खापर पणजोबा ह्यांनी त्यांच्या अक्षरात लिहिल्या होत्या. सर्व मोडी भाषेत. फास्ट लिपी त मोडी लिहिलेले मी अंकलिपी नंतर प्रथमच पाहिले. इंग्रजी प्रमाणे कर्सिव्ह मराठी लिहिता येत होते तर. माझी आजी ते मोडी हळू हळू का होईना पण वाचू शकत होती पण तिची मुले म्हणजे माझे वडील आणि काकाना मोडी कळत न्हवते. त्या पुस्तकात वंशावळ लिहिली होती. देणे घेणे लिहून ठेवले होते, ठळक घटना लिहून ठेवल्या होत्या. पण ज्या पिढीच्या हातात हे दस्तऐवज होते (माझ्यासकट) त्यांना मोडी भाषा समजत न्हवती. मोडी लिपी केवळ एकदोन पिढ्यांमध्ये मोडीत निघाली होती. आधुनिक तथाकथित इंग्रजी शिक्षणापुढे लोकांनी मोडी कडे पाठ फिरवली आणि मोडी भाषेने मान टाकली. आज आम्ही साठी मध्ये असणाऱ्या पिढीला निदान मोडी मराठी भाषा विशिष्ट लिपी सह अस्तित्वात होती हे माहीत आहे पण आमच्या पुढच्या पिढीला कसे माहीत पडणार? दस्तऐवज बघून झाल्यावर आजी ते पुन्हा चौरंगाच्या पेटीत जपून ठेवायला सांगायची. पुन्हा ते पुढच्या वर्षी उघडायचे आणि नजरेखालून घालायचे असा प्रघातच पडला. ह्या वह्या पूर्वजांच्या होत्या, त्या त्यांनी हाताळल्या होत्या, बोरू आणि शाई ने त्यात त्यांनी मराठी मोडी भाषेत मजकूर लिहिला होता ह्या जाणिवेनेच शहारे येत असत. कधी लिहिला असेल मजकूर? ह्या घरात? मुंबईला नोकरीत असतांना ? निवृत्त झाल्यावर? का वेळ मिळेल तेंव्हा ? दिवसा की रात्री दिवा/कंदिलाच्या उजेडात लिहिला असेल? बैठकीचा मेज वापरला असेल का चौरंगाला च मेज केला असेल? बोरू घरीच बनवत असत की बाजारातून आणून ठेवले असतील? आणि शाई? शाई ची पावडर वापरली असेल की द्रव शाई? काही मजकूर शिशाच्या पेन्सिल ने लिहिलेला पण होता.

बारावी नंतर गावी जाणे झाले नाही. पुढे पदवी परीक्षा आणि मग नोकरी. त्यामुळे पूर्वी दरवर्षी गावी जाणे थांबले. पुढे आजी वारली. गाव चे घर पोरके झाले. पुढे जास्त कोणी लक्ष दिले नाही. मोडी लिपीतले ते दस्तऐवज कुठे गेले काही कळले नाही. लोकं अशा गोष्टी जपून ठेवतात. आम्हाला ते जमले नाही. लहानपणी हे दस्तऐवज पहातांना मोडी शिकायची जबरदस्त उर्मी यायची पण ते शक्य झाले नाही. त्या चौरंगाच्या बाजूला जुने ग्रंथ होते – पांडवप्रताप, हरिविजय, रामायण, भागवत वगैरे. त्यांची पारायणे चातुर्मासात अथवा नामसप्ताह सोहळ्यात केली गेली असतील. त्यांना पण माझ्या आजीने, आजोबांनी पंजोबानी हाताळले असेल. ते ग्रंथ पण सापडले नाहीत. काळाच्या ओघात घराच्या आधी ते जीर्ण होऊन अस्त पावले असतील. जुन्या मोजमापाची साधने घरात होती – पायली, शेर, खंडी, मण ह्यांची मापे घरात होती. किलो आणि ग्राम तेंव्हा वापरात न्हवते. कालप्रवाहात ही लाकडी मापे फुटून गेली असावीत. आता कोणाकडे असतील तर ती कोपऱ्यात पडलेली असतील अगदी दगडी जात्याप्रमाणे किंवा लाकडी भात भरडण्याच्या जात्या सारखे.

प्रकाश दिगंबर सावंत

१६ फेब्रुवारी २०२२ 

Thursday, 27 February 2020

गावाकडची कोळशाची मशेरी आणि काळा चहा


तीस चाळीस वर्षांपूर्वी मी पाच सहा वर्षांचा असताना कोकणात गावी जायचो त्यावेळचे दिवस वेगळेच होते. त्यावेळी मुंबईतील चाकरमानी रातराणी एस टी ने गावी जायला प्राधान्य द्यायचे कारण दैवाची कामे करून संध्याकाळी गावाकडे निघायची संध्याकाळची वेळ सोयीची असायची आणि उन्हाळ्यात रात्रीचा प्रवास गर्मी चा त्रास होऊ नये म्हणून सोयीचा पडायचा. सायंकाळी - वाजता सुटलेली गाडी सकाळी सहा - सात वाजता गावात पोचायची.

एस टी स्टॅन्ड वर उतरून घराकडे चालत जायला लागायचे. पंधरा ते वीस मिनिटे लागायची. एस टी ची सतत घरघर ऐकून गावात उतरल्यावर जाणवणारी निरव शांतता मुंबई सारख्या शहरात कधीच अनुभवलेली नसायची त्यामुळे इथे ती अंगावर यायची. त्या शांततेमुळे कुठे तरी दूर आडगावी निवांत आणि शांत ठिकाणी आल्याची जाणीव व्हायची. आमचे गाव तसे त्याकाळी अस्सल खेडेगाव होते.त्याकाळी तेथे रिक्षा न्हवत्या, गाड्या कोणाकडे क्वचित होत्या. त्यामुळे बैलगाडी हेच एकमेव वाहतुकीचे साधन होते; आणि पायी चालत जाणे हे तर जीवनाचा अविभाज्य भाग होता.  तांबड्या पायवाटेने दव पडलेल्या सुक्या गवतावरून त्याचा ओला वास घेत पायी चालत जाता जाता पक्ष्याचे आवाज, ढोरांचे हंबरणे, शेणा मुताचा वास आणि मधून येणारा काटक्या जाळण्याचा वास घेत जाताना तसेच शेतात कामाला जाणारे काही आणि लोटा घेऊन माळावर जाणारे गाववाल्यांच्या चौकशाना सामोरे जात घर कधी यायचे ते कळायचे नाही.

पांदीतून जाताना घराचे दार समोर दिसायचे. आजी स्वागताला उत्सुकतेने उभीच असायची. आम्हा छोट्या नातवंडांना बघून ती धावत पुढे यायची आणि आम्हाला मिठीत घेत तिचा खरखरीत हात आमच्या तोंडावरून फिरवत राहायची आणि आम्हाला घरात घेऊन जायची. ती एकटीच घर सांभाळायची. आम्ही घरात आल्यावर तिची लगबग सुरु व्हायची.

मग आमची पण लगबग सुरु व्हायची. हातपाय धुवून दात घांसण्यासाठी. पण त्यावेळी मुंबईमध्ये वापरली जाणारी पेस्ट किंवा दंतमंजन आणलेले नसायचे. मग आमच्यासमोर कोणीतरी गावठी दंतमंजन बनवून द्यायचा. आमच्यासमोर खापरीवर कोळसे अथवा निखाऱ्यावर शेणी जाळली  जायची, त्याची राख केली जायची. ती राख बारीक चूर्णासारखी करून मग वस्त्रगाळ करून वाडग्यात घेतली जायची आणि त्यात चिमूटभर बारीक केलेले मीठ टाकले जायचे की झाले दंतमंजन तयार -जे आमच्या हातावर ठेवले जायचे. राख - कोळसा - मीठ असलेले ते काळपट - राखाडी दंतमंजन आम्हाला त्यात कोळसा, शेण (म्हणजे गुरांची शी ! ) आणि राख असल्यामुळे कसे कसेच वाटायचे - अजिबात आवडायचे नाही.  पण उपाय नसल्यामुळे झाक मारत ते वापरायला लागायचे. आमचे नखरे बघून आजी सांगायची - "अरे खुळ्यांनो, शेणाच्या ह्या गावच्या घरी बनवलेल्या राखुंडीत चांगले गुणधर्म असतात आणि मीठ टाकल्यामुळे ही जंतुनाशक झालेल्या ह्या  मशेरीसमोर तुमच्या शहरातल्या पावडरी झाक मारतील." तरी आम्ही तोंड वेंगाडत राहात असू.   तोंड वेडेवाकडे करून आम्ही ते लावायचो आणि तालुक्याच्या  बाजारातून रतनज्योत किंवा कोलगेट पावडर आणून द्या म्हणून पालकांच्या मागे लागायचो. मग जेव्हा कोणी बाजाराला जाईल त्यावेळी ती पावडर आणली जायची तोपर्यंत गावठी कोळसा आणि राखुंडी   मीठ असलेली गावठी दंतमंजन पावडर वापरायला लागायची. पुढे मुंबईवरून गावी येताना आम्ही बॅग भरताना आमची दात घासायची पावडर अथवा पेस्ट आमच्या बॅगेत विसरता पॅक करायचो.  

आजी नंतर आम्हाला चहा करून देते म्हणून चुलीवर पातेल्यामध्ये पाण्याचे आधण ठेवायची आणि चहा बनवायच्या तयारीला लागायची. तोपर्यंत आम्ही हात पाय धुवायच्या मागे व्यस्त होऊन कपडे बदलून यायचो आई स्वयंपाक घरात चहासाठी बसायचो. आजी मग चहाचे कप पुढे करायची. त्यातला काळा कुट्ट चहा पाहून आम्ही दोन पावले मागेच सरायचो. अशा चहा पिण्याची सवय नसल्यामुळे तो आम्हाला काढ्यासारखा लागायचा.  गुळाचा, दूध नसणारा काळा चहा मुंबईत कधी प्यायलेला नसल्यामुळे ही अवस्था व्हायची. मग आजी सांगायचीगावाकडे दूध नसल्यामुळे हा चहा काळा आहे आणि त्यात गूळ टाकलेला आहे; अरे हा काळा चहा प्रकृतीला चांगला. त्यात गूळ आहे त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. असा चहा रोज प्यायला तरी ठणठणीत राहाल - कसला तो पांढऱ्या साखरेचा चहा पिता रे तुम्ही?" आम्हा मुलांना काही ते पटायचे नाही. आम्ही चहा प्यायचो नाही. नातवंडे चहा पित नाही म्हटल्यावर आजी व्यथित व्हायचो. तो कोणाकडून तरी दुधाचा रतीब (आम्ही गावी असेपर्यंत) लावायची आणि गुळाचा दूध घातलेला चहा बनवायची. तो पण प्यायला आम्ही का- कू करू लागल्यावर मग ती माझ्या वडिलांना अथवा काकाला तालुक्याच्या बाजारातून साखर आणायला लावायची आणि आम्हाला मुंबई सारखा चहा मिळू लागायचा.पण गावात ज्यांच्या ज्यांच्या घरी जायचो त्या सर्वांकडे आम्हाला काळाकुट्ट गुळाचा चहाचा काढाच मिळायचा आणि मग साक्षात्कार व्हायचा की अशी चहा प्यायची इथली "लाइफस्टायल" आहे; त्यामुळे आम्ही गावी असेपर्यंत जर कधी दूध नसले वा साखर नसली अथवा दोन्ही नसले त्यावेळी घरी बनलेला गुळाचा बिन दुधाचा चहा आम्ही गोड मानून घ्यायचो.

आज आम्ही मल्टिनॅशनल कंपन्यांची जाहिरात बघतो ज्यात त्यातली सुंदर बाई विचारते "तुमच्या दंतमंजनामध्ये मीठ आहे काय? त्यात कोळसा आहे काय?" अरे चाळीस वर्षांपूर्वी आमचे आजे-पणजे आम्हाला कोळसा आणि मीठ असलेले दंतमंजन ताजे बनून देत होते त्यावेळी कोळसा - राख दातांना वाईट, इनॅमल ची वाट लागते असे ह्या कंपन्या सांगत होत्या आणि आम्हाला भ्रमित करून आपले प्रोडक्ट्स प्रमोट करत होते. आज ह्या कंपन्यांना अचानक राखुंडी -  कोळसा - मीठ दातांच्या आरोग्यासाठी चांगले असल्याचा जावई शोध लागलाय काय? त्यांच्या टूथ पेस्ट मध्ये शरीराला अपाय करणारे फ्लोराईड आणि लौरीयल सल्फेट असल्याचे रिपोर्ट्स बाहेर येऊ लागलेत. मग आमची ती निसर्गाशी तादाम्य पावणारी दंतमंजन बनवायची प्राकृतिक पद्धत काय वाईट होती?


आज डीप डीप चहाचे फ्याड आले आहे. हर्बल आणि ग्रीन टी आरोग्याला कसा चांगला हे आपण एकमेकाला सांगत असतो. बिन दुधाचा चहा आरोग्याला चांगला म्हणून तो तसा (आणि बिन साखरेचा पण) प्यायची फॅशन अली आहे. साखर आरोग्याला घटक असल्याचे किती तरी रिपोर्ट्स आपण वाचले आहेत. साखरे ऐवजी गूळ चांगला असे पाश्चात्त्य लोक आता सांगू लागले आहेत. काळा गूळ आहारात असावा असे पण आहार तज्ञ् सांगत आहेत. रक्तातील साखर वाढू नये म्हणून, तसेच वजन वाढू नये म्हणून साखर आहारातून वागला, गूळ वापरा, ग्रीन टी प्या असे आज जे सांगत आहेत त्यांना ओरडून सांगावेसे वाटते की आपले पूर्वज, माझी आजी बिन साखरेचा गुळाचा काळा चहा देताना वेगळे काय सांगत होती?  ज्या पाश्चात्त्यांच्या औदयोगिक क्रान्तिला भुलून, त्यांच्या संशोधनाला प्रमाण मानून आपण बऱ्याच चांगल्या परंपरागत गोष्टींचा त्याग केला तेच पाश्चात्त्य आता आपल्या प्रथा, खाण्याच्या पद्धती, आयुर्वेद उपचार अंगिकारात आहेत.

आज गावे सुधारली आहेत. जग जवळ आले आहे. मुंबईत मिळणाऱ्या साऱ्या वस्तू आज गावाकडे सहजा सहजी उपलब्ध आहेत. आज चुलीची जागा गॅस ने घेतली आहे. कोलगेट ने मार्केटिंग करून गावोगावी पेस्ट आणि ब्रश उपलब्ध करून दिले आहेत. बऱ्याच घरांमध्ये आज साखरेचा चहा बनतो आणि हो दुधाचा पण - कारण पॅक केलेले दूध आज गावाकडे सर्वत्र मिळते. अशा पॅक केलेल्या दुधात पण भेसळ केली जाते. आज गावाकडे खापरीवर शेणी जाळून मशेरी करून देणारा कोणी राहिला नाही. तेवढा कोणाला वेळी नाही. आज गावाकडे काळा चहा मिळेल पण साखरेचा मिळेल, गूळ फार कमी लोक वापरतात. चाळीस पन्नास वर्षांपूर्वी कोकणातल्या आमच्या गावाकडच्या खेड्यात असलेली जीवन -पद्धती आरोग्याच्या हितासाठी किती योग्य होती ही दृष्टी थोडी उशिरा म्हणजे आज मोठे झाल्यावर, जग पाहिल्यावर, शिकले सावरल्यावर मिळाली. सगळंच जुनं वाईट नसतं आणि टाकून देण्यासारखे नसते ही जाणीव जुन्या आठवणी कुरतडत राहाते आणि काहीतरी हरवल्याच्या भावनेने जीव कासावीस होत राहातो.

- प्रकाश दिगंबर सावंत