Sunday, 19 February 2023

मला आवडलेले पुस्तक - काळोख आणि पाणी (अरुणा ढेरे लिखित)

महाभारतात नाही ते जगांत नाही असे म्हणतात - "काळोख आणि पाणी" ह्या श्रीमती अरुणा ढेरे लिखित पुस्तकात मानवी स्वभावाचे अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत. उत्तुंग वाटणाऱ्या व्यक्तिमत्वांची पावले शेवटी मातीचीच होती हे प्रकर्षाने जाणवते. ह्या संग्रहात अनेक अशा कथा आल्या आहेत ज्या कधी ऐकल्या अथवा वाचल्या न्हवत्या. कधी तरी आजी च्या तोंडून "आज शेषाची पाळी" ची कथा ऐकलेली अंधुकशी आठवते. महाभारत, त्यातील व्यक्तिरेखा, त्यांच्या वर्तवणुकीचे विश्लेषण, त्यांच्या वर्तवणुकीची जनमानसावर पडलेली छाप आणि त्यातून जन्मलेल्या (आपण न वाचलेल्या) कथा ह्या पुस्तकात दिलेल्या आहेत ज्या आपणाला अंतर्मुख करून सोडतात. गांधारीची धृतराष्ट्र आणि दुर्योधनामध्ये होणारी कुचंबणा, धृतराष्ट्राचा अप्पलपोटेपणा, भीष्मांची स्त्रियांबद्दलची निरीच्छ वृत्ती. दुर्योधनाचा युद्धाच्या शेवटी त्याला जाणवलेला एकाकीपणा, रितेपण आणि ऐन युद्धाच्या समरप्रसंगी आलेली निरागस बालपणाची आठवण - त्यांचे कौरव पांडवांचे एकत्र खेळण्याचे चांगले दिवस त्याला आठवतात तो क्षण आपणाला पण हळवे करून सोडतो, जीवन संघर्षाचा फोलपणा जाणवून देतो. कितीतरी असे पैलू ह्यात वाचायला मिळतात. आदिमायेची रक्ताची आस, तिची द्रौपदी शी जोडलेली नाळ आणि कृष्णाच्या पायाला बाण लागून अवतारपूर्ती च्या वेळी सांडलेला रक्ताचा थेंब त्या आदिमायेच्या रक्ताची आस पूर्ण करणार आहे काय? विशेष करून "कुंतीचा नातू" ही कथा वेगळाच आशय मांडून आपणाला जीवनाचे तत्वज्ञान सांगून जाते
- प्रकाश दिगंबर सावंत 
- १० फेब्रुवारी २०२३ 

No comments:

Post a Comment