Wednesday, 16 February 2022

मोडी लिपी - एक आठवण

 लहानपणी कोकणात मे महिन्याच्या सुट्टीत गावी जायचो. त्यावेळी अगदी बारावी पास होईपर्यंत मी गावाला जायचो. ऐंशी च्या दशकापर्यंत गावाकडे लाईट न्हवती. त्यामुळे रात्री बैठे खेळ दिव्याच्या अथवा कंदिलाच्या उजेडात खेळले जायचे नाहीतर एखादे गोष्टीचे पुस्तक वाचले जायचे. नऊ च्या दरम्यान जेवण खान आटपून दहापर्यंत झोपी जायचो. गावाकडे पहिले काही दिवस नव्या नवलाई प्रमाणे आसपास फिरण्यात आणि भेटीगाठी करण्यात जायचे. मुंबई ला परते पर्यंत मधला काळ मग फडताळे शोध, पेट्या शोध, पोटमाळे शोध असे करण्यात जायचे. अशा वेळी जुने पुराणे कागदपत्रे हाती लागायची. मला आठवते जुन्या पिवळ्या पडलेल्या वह्या, खतावण्या हाती लागल्या होत्या. त्या म्हणे माझ्या आजोबांनी आणि पणजोबा – खापर पणजोबा ह्यांनी त्यांच्या अक्षरात लिहिल्या होत्या. सर्व मोडी भाषेत. फास्ट लिपी त मोडी लिहिलेले मी अंकलिपी नंतर प्रथमच पाहिले. इंग्रजी प्रमाणे कर्सिव्ह मराठी लिहिता येत होते तर. माझी आजी ते मोडी हळू हळू का होईना पण वाचू शकत होती पण तिची मुले म्हणजे माझे वडील आणि काकाना मोडी कळत न्हवते. त्या पुस्तकात वंशावळ लिहिली होती. देणे घेणे लिहून ठेवले होते, ठळक घटना लिहून ठेवल्या होत्या. पण ज्या पिढीच्या हातात हे दस्तऐवज होते (माझ्यासकट) त्यांना मोडी भाषा समजत न्हवती. मोडी लिपी केवळ एकदोन पिढ्यांमध्ये मोडीत निघाली होती. आधुनिक तथाकथित इंग्रजी शिक्षणापुढे लोकांनी मोडी कडे पाठ फिरवली आणि मोडी भाषेने मान टाकली. आज आम्ही साठी मध्ये असणाऱ्या पिढीला निदान मोडी मराठी भाषा विशिष्ट लिपी सह अस्तित्वात होती हे माहीत आहे पण आमच्या पुढच्या पिढीला कसे माहीत पडणार? दस्तऐवज बघून झाल्यावर आजी ते पुन्हा चौरंगाच्या पेटीत जपून ठेवायला सांगायची. पुन्हा ते पुढच्या वर्षी उघडायचे आणि नजरेखालून घालायचे असा प्रघातच पडला. ह्या वह्या पूर्वजांच्या होत्या, त्या त्यांनी हाताळल्या होत्या, बोरू आणि शाई ने त्यात त्यांनी मराठी मोडी भाषेत मजकूर लिहिला होता ह्या जाणिवेनेच शहारे येत असत. कधी लिहिला असेल मजकूर? ह्या घरात? मुंबईला नोकरीत असतांना ? निवृत्त झाल्यावर? का वेळ मिळेल तेंव्हा ? दिवसा की रात्री दिवा/कंदिलाच्या उजेडात लिहिला असेल? बैठकीचा मेज वापरला असेल का चौरंगाला च मेज केला असेल? बोरू घरीच बनवत असत की बाजारातून आणून ठेवले असतील? आणि शाई? शाई ची पावडर वापरली असेल की द्रव शाई? काही मजकूर शिशाच्या पेन्सिल ने लिहिलेला पण होता.

बारावी नंतर गावी जाणे झाले नाही. पुढे पदवी परीक्षा आणि मग नोकरी. त्यामुळे पूर्वी दरवर्षी गावी जाणे थांबले. पुढे आजी वारली. गाव चे घर पोरके झाले. पुढे जास्त कोणी लक्ष दिले नाही. मोडी लिपीतले ते दस्तऐवज कुठे गेले काही कळले नाही. लोकं अशा गोष्टी जपून ठेवतात. आम्हाला ते जमले नाही. लहानपणी हे दस्तऐवज पहातांना मोडी शिकायची जबरदस्त उर्मी यायची पण ते शक्य झाले नाही. त्या चौरंगाच्या बाजूला जुने ग्रंथ होते – पांडवप्रताप, हरिविजय, रामायण, भागवत वगैरे. त्यांची पारायणे चातुर्मासात अथवा नामसप्ताह सोहळ्यात केली गेली असतील. त्यांना पण माझ्या आजीने, आजोबांनी पंजोबानी हाताळले असेल. ते ग्रंथ पण सापडले नाहीत. काळाच्या ओघात घराच्या आधी ते जीर्ण होऊन अस्त पावले असतील. जुन्या मोजमापाची साधने घरात होती – पायली, शेर, खंडी, मण ह्यांची मापे घरात होती. किलो आणि ग्राम तेंव्हा वापरात न्हवते. कालप्रवाहात ही लाकडी मापे फुटून गेली असावीत. आता कोणाकडे असतील तर ती कोपऱ्यात पडलेली असतील अगदी दगडी जात्याप्रमाणे किंवा लाकडी भात भरडण्याच्या जात्या सारखे.

प्रकाश दिगंबर सावंत

१६ फेब्रुवारी २०२२ 

No comments:

Post a Comment