Sunday, 27 November 2016

चलन बदल = देश बदल?

आठ नोव्हेंबर (२०१६) ला रात्री आठ वाजता पंतप्रधान मोदींनी १००० आणि ५०० च्या चलनी  नोटा  रद्द करण्याचा धाडसी निर्णय जाहीर केला आणि देशात मोठा आर्थिक भूकंप झाला. मोदी ह्यादिवशी रात्री आठ वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण देणार होते; बर्याच लोकांना वाटले कि ते बहुतेक पाकिस्तान च्या कुरापतींवर बोलणार आणि कदाचित युद्धाच्या शक्यतेवर वक्तव्य करणार. पण त्यांनी काळ्या पैशा विरुद्ध लढाई जाहीर केली आणि बहुतेक लोक त्यांच्या ह्या घोषणेने सुन्न झाले. सामान्य माणूस सोडा पण कोणत्याही पक्षाचा नेता त्यावेळी काही दिवस प्रतिक्रिया व्यक्त करू शकला न्हवता. मात्र त्यादिवशी रात्रीच लोकांनी ए टी एम मशीन वर धाव घेऊन पैसे काढण्यासाठी पराकाष्टा केली पण नव्या नोटा त्यात न्हवत्या आणि मिळालेल्या ५००/१००० च्या जुन्या नोटा चालणार न्हवत्या. परंतु सरकारने जुन्या नोटा बदल्यनाची स्कीम आणि जुन्या नोटा ब्यांकेत भरण्याची स्कीम जाहीर केली. मी पण जुन्या नोटा बदलून घेतल्या आणि जुने चलन माझया खात्यात भरून टाकले. पुढे २ डिसेंबर पर्यंत इस्पितळे, टोल  नाके, सरकारी कार्यालये, नगरपालिका कर, फोन बिले वगैरे भरण्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची व्यवस्था सरकारने केली. पण २-३ आठवडे उलटून हि लोकांना अजून नव्या ५०० - १००० च्या नोटा मिळालेल्या नाहीत. २००० च्या नोटा मिळताहेत पण त्याची चेंज कोणीच देऊ इच्चीत नाही. नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर फक्त २००० च्या नोटा बाजारात आल्या आणि ५०० -१००० च्या नोटा हव्या तेवढ्या छापल्या गेल्या नसाव्यात बहुधा.१०० च्या नोटा चलनातून गायब झाल्यासारख्या झाल्या.  नव्या २०००/५००/१००० च्या नोटांची साईझ बदलल्याने देशातील लाखो ए टी एम मशीन च्या डिस्पेंसिंग सिस्टीम बदलाव्या लागल्या आणि त्यामुळे लोकांची गैरसोय झाली. बाजारपेठ थंड झाली. लोक पैसे वापरण्यासाठी हात आखडू लागले.उपहार गृहे, मॉल ओस पडले, वाण्यांचे  व्यवहार मंदावले, फ्लिप कार्ट - अमेझॉन- स्वीग्गी ह्यांच्या ऑन लाईन ऑर्डर सिस्टीम ब्लॉक झाल्या ; पण जुन्या नोटा वापरण्याच्या सुविधेमुळे सरकारचे कर आणि इतर उत्पन्न वाढले. जे लोक वीज बिले भारत न्हवती, वर्षानुवर्षे ज्यांनी मालमत्ता कर भरला न्हवता, फोन बिले उधार ठेवली होती त्यांनी जुन्या नोटा वापरून आदर्श नागरिकांचे कर्तव्य बजावले. गृहिणींनी एवढ्या वर्षात नवर्याच्या अपरोक्ष बचत करून पिगी ब्यांक अथवा डब्यामध्ये जे पैसे साठवले होते आणि जे असे अडकून बसले होते ते बाहेर आले. सरकारने एका खात्यात अडीच लाख भरण्याची मुभा दिल्याने प्रामाणिक नागरिकांनी ते आपापल्या खात्यात भरून टाकले. मोदींनी ५० दिवसांचा अवधी मागितला आहे जनते कडे सारे काही सुरळीत करण्यासाठी आणि लोकांना पण जुन्या नोटा आपापल्या खात्यात भरण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत चा अवधी दिलेला आहे. 

मोदी सरकारने हा निर्णय का घेतला? मुख्य उद्देश काळा पैसा बाहेर काढणे आणि खोट्या नोटांचा व्यवहार (आणि पर्यायाने अतिरेक्यांचे कंबरडे मोडणे) हा होता. ह्या निर्णयावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्या लोकशाही असणाऱ्या देशात अपेक्षित आहेतच आणि त्या होणारच. पण काळा पैसा बाहेर काढण्यासाठी उचलेले पहिले पाऊल म्हणून सर्व सामान्य लोकांनी ह्या धाडसी निर्णयाचे स्वागत केले. १९७८ मध्ये मोरारजी देसाईंनी १००० च्या नोटा रद्द केल्या होत्या परंतु त्यावेळी सर्व सामान्यांना त्याची झळ अजिबात पोचली न्हवती कारण त्यावेळी त्यांच्यासाठी १०० ची नोट मोठी होती आणि ती पण क्वचित असायची एखाद्याकडे. पगार पण चार आकडी क्वचित असायचा. लोकांचे व्यवहार रोखीत जास्त असायचे आणि ब्यांकेत खाती फार थोड्या लोकांची होती. ब्यांके शी संबंध म्हणजे डी डी काढणे, चलन भरणे ह्यासारख्या गोष्टींपुरता मर्यादित होता. पगार ब्यांकेत जमा करण्याची पद्धत फार कमी होती - पगाराच्या दिवशी कामगारांना रोख रक्कम मिळत असे आणि ती घेऊन ते आपापल्या घरी जात असत. ५०-२०-१० च्या नोटा त्यावेळी वापरात होत्या. १००० च्या नोटा खूप कमी लोकांकडे होत्या त्यामुळे त्यावेळी व्यवहार अजिबात ठप्प झाले न्हवते. २०१६ मध्ये १००० आणि ५०० च्या जास्त नोटा व्यवहारात होत्या आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन ठप्प  झाले. आणि हे जीवन ५० दिवसांपेक्षा जास्त दिवस जर ठप्प  झाले तर त्याचे दूरगामी परिणाम मोदी सरकारला भोगावे लागतील. त्यामुळे हाय रिस्क असलेला मोदींचा हा निर्णय धाडसी म्हणावा लागेल. 

आपल्या देशाला लागलेल्या दोन मोठ्या किडी म्हणजे भ्रश्टाचार आणि काळा पैसा. एका परदेशी तज्ञाने म्हटले आहे कि भ्रश्टाचार हा भारतीयांच्या हाडी -मासी भिनलेला आहे. भारतात देवळामध्ये नवस बोलला जातो आणि तो पूर्ण झाला कि मग देवाला जे काही बोलले असेल त्याची लाच दिली जाते. माझे अमुक काम कर मग मी तुला तमुक देईन असे देवाला सांगितले जाते आणि आपण ते लहानपणापासून पाहात असतो. त्यामुळे सरकारी कार्यालयात एखादे काम करण्यासाठी आपल्याला लाच देण्यात काहीच वावगे वाटत नाही. उलट ते काम बिना झंझट आणि लवकर होते असे आपण खाजगीत बोलत असतो आणि पुढच्या पिढीला हे संक्रमित करत असतो. एक बाई आपल्याला नातू होऊंदे मग मी तुला त्याच्या पाचव्या वाढदिवसाला सोन्याचा वाला  देईन असा नवस बोलते आणि नातू झाल्यावर त्याला पाच वर्षांनी जेव्हा देवळात घेऊन नवस फेडायला जाते तेव्हा नातवाच्या पायातला कथलाचा  वाळा देवाला अर्पण करते तेव्हा देव प्रकट होतो आणि रागावून विचारतो " हे काय? तू सोन्याचा वाळा देणार होतीस ना? कथलाचा काय देतेस?" तेव्हा ती बाई म्हणते " देवा माझया नातवाचे नाव सोन्या ठेवले आहे आणि मी त्या सोन्याचाच वाळा तुला देत आहे" आपल्याकडे हे असेच आहे. आपण कर चुकवतो, ऍडमिशन साठी डोनेशन देतो, कॅपिटेशन फी देतो, साध्या साध्या व्यवहाराची पावती घेत नाही, सिग्नलला पकडले कि लाच देऊन पसार होते आणि नकळत भ्रश्टाचार पोसतो.  माझा एक मित्र आहे. वीस वर्षांपूर्वीचा त्याचा तालुक्याच्या ठिकाणी आलेला आर टी ओ चा अनुभव वाचा - त्याने ठरवले कि काही झाले तरी दुचाकीच्या लायसन्स साठी तो एजंट वापरणार नाही. त्याने स्वत: अर्ज केला, तो भरला, कागदपत्रे सर्व लावली. त्याला ट्रायल साठी बोलावले गेले. आपली नवी दुचाकी घेऊन तो गेला. पण त्याला अधिकाऱयांनी पास केले नाही. गाडी नवी असल्यामुळे त्यात काही खुसपट काढता आले नाही पण तुला अमुक रुल माहीत आहे का - तमुक क्लॉज माहीत आहे का वगैरे नसते प्रश्न विचारून हैराण केले. दहा महिने त्याने खेपा घातल्या पण लायसन्स मिळाले नाही शेवटी वैतागून त्याने एजंट वापरला आणि कुठेही जायला न लागता त्याला १० दिवसात लायसन्स घरपोच मिळाले. त्याने हा अनुभव आम्हाला सांगितल्यावर आम्ही काय ठरवले असणार? अर्थात एजंट वापरून आपले लायसन्स काढायचे. भ्रश्टाचार हा शिश्टाचार होतो तो हा असा! 
कित्येक लोक कर भारत नाहीत तो बुडवतात - बुडालेला कर काळा पैसा तयार करतो. जमिनीचे व्यवहार होतात - त्याची किंमत कमी दाखऊन कर बुडवला जातो, राजकीय पुढाऱयांचे व्यवहार होतात त्यात कमिशन घेतले जाते, उद्योगपतींना कर्जे दिली जातात - ती बुडवली जातात त्यातून काळा पैसा तयार होतो. हे सगळे व्यवहार सामान्य माणसाच्या कक्षेबाहेर असतात. बिचारा पगारदार असणारा सामान्य माणूस - त्याचा आयकर आधीच कापून घेतला जातो. त्याला काहीच पर्याय नसतो. सामान्य माणूस कर्ज मागायला गेला तर त्याला डझनांनी पेपर आणि प्रूफ आणायला सांगितले जाते तर माल्या सारख्या उद्योगपतींना कोट्यवधी ची कर्जे पायघड्या घालून आणि काहीच तारण न घेता मंजूर केली जातात. सामान्य माणसाला त्याच्या आयकराच्या बदल्यात काय मिळते? काहीच नाही! परदेशात निदान कर देणार्या नागरिकाला मेडिकल सुविधा, पेन्शन, प्राथमिक गरजा पूर्ण करण्याची शाश्वती मिळत असते - इकडचा सामान्य कर भरून शेवटी निवृत्त झाला कि निरुपयोगी पदार्थासारखा बाहेर रस्त्यावर फेकला जातो आणि पेन्शन साठी आपण जिवंत असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आणि महिन्याचे पेन्शन घेण्यासाठी रांगा लावून खेटे मारत राहातो.    

काही उद्योजक म्हणतात कि सरकार सुविधा उपलब्ध करून देत नाही, वीज नाही, पाणी नाही, रस्ते नाहीत, बंदरे नाहीत. ठीक आहे. हि परिस्थिती कोंबडी पहिली की अंडे पहिले अशी आहे. सर्वानी प्रामाणिकपणे सर्व कर भरा आणि सरकारने मग जर काम नाही केले, सुविधा उपलबध करून नाही दिल्या तर जाब विचारा नाहीतर त्यांना पद्च्युत करा. आज अचानक विरोधी पक्षांना सामान्य माणसांच्या रांगेत उभ्या राहण्याच्या हाल अपेष्टांची जाणीव झाली आणि सगळे एकत्र होऊन सरकार विरोधी आंदोलनासाठी उभे राहिले. त्यांची मागणी काय तर पूर्वीच्या नोटा रुजू करा? का सामान्य माणसासाठी कि त्यांच्या स्वता साठी? आम्ही देवळात रांगेत उभे राहातो, विमानतळावर रांगेत उभे राहातो त्यावेळी जेव्हा हे नेते तेथे येतात तेव्हा व्ही आय पी म्हणून का पुढ जातात? ते का नाही रांगेत उभे राहात? त्यांना का नाही तेव्हा आमचा कळवळा येत? ह्या विरोधकांनी उलट सरकार ला त्यांच्या निर्णयाबद्दल सपोर्ट केले पाहिजे आणि नागरिकांना काय सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत ह्याचा विचार विनिमय केला पाहिले त्या ऐवजी ज्या प्रकारे हे विरोधक गेला काढत आहेत ते पहाता त्यांना स्वत ची आणि स्वताच्या काळ्या पैशाची जास्त फिकीर आहे ह्याची खात्री पटते. 

मोदी प्रामाणिक आहेत. इतर राजकीय नेत्यांसारखे त्यांचे कोणी नातेवाईक कुठेच उच्च पदावर कार्यरत नाहीत. मोदी स्वत: कोणत्याच घोटाळ्यात अडकलेले नाहीत. ते २० - २० तास  काम करत आहेत. सर्व विदेशी नेते त्यांना आता मानत आहेत एवढेच न्हवे तर त्यांच्या ह्या धाडसी निर्णयाचे बर्याच राष्ट्रनेत्यांनी स्वागत केले आहे. बर्याच दिसांनी एक द्रष्टा नेता आपल्याला लाभला आहे आणि तो देशहिताचा निर्णय घेत आहे हे लोकांना पटलेले आहे आणि त्यामुळे ओळ सहनशील राहून सहकार्य करत आहेत. पुढे पाऊल मोदी कदाचित स्विस बँकेतल्या पैशावर उचलतील अशी आशा लोकांना वाटते आहे. ही संधी सोडली तर पुन्हा असा निर्णय घेणारा नेता मिळेल का अशी एक भीती पण लोकांच्या मनात आहे. आपला देश स्वच्छ व्हावा, करप्शन फ्री व्हावा असे जनतेला आणि युवा पिढीला वाटते आहे. स्वातंत्र्या पूर्वी ब्रिटीशानी लुटले आणि स्वातंत्र्या नंतर आपल्याच नेत्यांनी लोकांचा पैसा आणि देशाला आणि आपल्याच लोकांना लुटले हि भावना सामान्य लोकांच्या मनात भरून राहिलेली आहे. त्यामुळे मोदींना ५० दिवसाचा अवधी देण्यास लोक तयार आहेत. कोणताही निर्णय घेतला तरी तो परिपूर्ण असू शकत नाही. सरकारने हा निर्णय जाहीर करण्याआधी नव्या २००० च्या, १००० च्या आणि ५०० च्या नोटा तयार ठेवल्या पाहिजे होत्या, निदान नव्या नोटांची साईझ बदलता कामा नये होती वगैरे वगैरे. कदाचित त्यांनी ह्या गोष्टी ध्यानात घेऊन निर्णय घेतला असेल पण त्याचे एक्झेक्युशन बरोबर झाले नसावे. जे काही असेल ते असो पण नवा देश घडतो आहे आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत ह्याचा आजच्या नागरिकाला अभिमान वाटत आहे. पुढच्या पिढीला एक चांगला देश, स्वच्छ देश पाहायला मिळेल असा आशावाद आहे. दुसर्या महायुद्धानंतर युरोपिय देश बेचिराख झाले; त्यावेळची आणि त्यापुढच्या पिढीने त्याग केला, कष्ट उपसले, मेहनत केली, नवा देश उभा केला - कोणासाठी पुढच्य पिढीसाठी - त्यामुळे युरोपीय देश पुढारलेले झाले. असाच काहीसा आशावाद आज लोकांमध्ये आहे. युरोपीय देशात आज ७० ते ८० टक्के व्यवहार कॅशलेस आहे. अमेरिकेत १०० च्या वर करन्सी  नाही! त्यांनी १९६९ मध्येच निर्णय घेऊन १०० च्या वरच्या नोटा रद्द करून टाकल्या आणि पुन्हा कुठल्याच राष्ट्राध्यक्षाने वरच्या नोटा चलनात आणल्या नाहीत. युरोप मध्ये १०० युरो च्या नोटा सहजी स्वीकारल्या जात नाहीत.   तर आजचा हा चलन बदल लोकांनी देश बदलेल म्हणून स्वीकारला आहे. 

चलन बदलून देश बदलेल? तुम्हाला काय वाटते? देश काय मोदी सारखा कोण एक माणूस बदलू शकतो ? हे असे काम केवळ दुसर्याने करायचे असते? आपले काहीच योगदान नाही? देशाच्या नागरिकांचे काहीच कर्तव्य नाही? मी सर्व कर भरेन आणि सर्व व्यवहाराची पावती मागेन , मी रहदारीचे सर्व नियम पालन करेन, मी गैर व्यवहार करणार नाही आणि करू देणार नाही, मी शिस्त सर्व सार्वजनिक ठिकाणी पालन कारेन, मी डोनेशन देणार नाही, कॅपिटेशन फे देणार नाही, मला आरक्षण नको, मी मतदान करणे बुडवणार नाही, मी योग्य नेता निवदेन, मी वशिलेबाजी करणार नाही, मी भ्रश्टाचाराला प्रोत्साहन देणार नाही, मी माझया कामाशी प्रामाणिक राहीन, मी सरकारी कर्मचारी असें तर कामात टंगळमंगळ आणि टाईमपास करणार नाही, मी लाच घेणार नाही व देणार नाही, मी सर्व व्यवहार ब्यांके मार्फत करेन, मी काळा पैसा जमा करणार नाही. मला वाटते आपल्याला एक सुजाण नागरिक म्हणून आपले चाल- चलन बदलावे लागेल. हे जेव्हा होईल तेव्हा देश बदलेल नुसते चलन बदलून नाही. तुम्हाला काय वाटते?

प्रकाश सावंत 







Tuesday, 11 October 2016

शास्त्र आणि शस्त्र

कालच एक पोस्ट पाहिली. मोदी साहेब दसर्याच्या मुहूर्तावर जवानांशी संवाद साधत होते - आणि लढाईच्या आयुधांची पूजा करताना दाखवले होते. त्यावर पोस्ट वर टिप्पण्णी अशी होती - कि या आधी आपण कधी भारतीय नेत्याला सणाच्या दिवशी जवानांशी संवाद करताना आणि आयुधांची पूजा करताना पाहिले होते का? ती पोस्ट पहाताना लक्षात आले कि आपण असे कधी या पूर्वी पाहिले नाही आणि पाहिले असले तर आता लक्षात नाही. आता सोशल मीडिया मुळे ह्या गोष्टी आपल्या पर्यंत पोहोचू शकतात. 

हि पोस्ट पहाताना एक गोष्ट ध्यानात आली कि जीवनात आयुधे आणि हत्यारे ह्यांचे एक स्थान असले पाहिजे. आपल्या संस्कृतीत शस्त्रे आणि शास्त्रे ह्या दोन्ही गोष्टींना महत्त्व दिलेले आहे. देवी देवतांच्या हातात शस्त्रे आणि शास्त्रे दोन्ही धारण केली असतात. शास्त्रे सर्वानी शिकून शिक्षित होणे आवश्यक आहे तेवढेच शस्त्र धारण करून ती चालवण्यात पारंगत होणे तितकेच जरुरी आहे. शास्त्रे स्व:शिक्षणासाठी आणि शस्त्रे स्व:रक्षणासाठी! शस्त्रांचा वापर करण्यासाठी योग्य निर्णय करणे आपसुक आहे ज्यासाठी मन संतुलित असणे आवश्यक आहे - जे शास्त्रे शिकून अवगत करता येते. 

काळाच्या ओघात शास्त्रे हरवली आणि अहिंसे च्या स्वीकृतीनंतर शस्त्रे म्यान केली गेली. प्राचीन महत्त्व पूर्ण ज्ञान विस्मृतीत गेले आणि म्यान केलेल्या शस्त्रांमुळे भारत वर्षातील क्षात्र तेज लोप पावत गेले. दसर्याच्या मुहूर्तावर आलेल्या मोदींच्या पोस्ट मुळे ह्या विचारांना वाचा फुटली. आज उठ सुठ शस्त्रे हातात घेणे योग्य नाही पण निदान देश हित लक्षात न ठेवता सर्जिकल स्ट्राईक वर वाचाळपणे वाट्टेल ते बरळनाऱ्या आपल्या नेत्यांनी, पत्रकारांनी, बॉलीवूड कलाकारांनी आणि तथाकथित सेलेब्रेटीज नी आपल्या जिभेवर ताबा ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे. ह्या वाचाळ वीरांना अशी विनंती आहे कि जिभेचे शस्त्र म्यान करा आणि आयुधे हातात घेऊन निदान सहा महिने लष्करी सेवा करण्यासाठी सीमेवर जा. दसर्याच्या शुभेछा

११ ऑक्टोबर २०१६

अमिताभ बच्चन - नॉट आउट 74

तो कोलकात्त्याला नोकरीला होता. "आतला" आवाज त्याला कला क्षेत्रात जायला सुचवत होता. त्या "आतल्या" आवाजाची आज्ञा मानून त्याने मुंबई ला प्रस्थान केले. रेडिओ सिलोन साठी निवेदक म्हणून आपल्या भारदस्त "आवाजाची" टेस्ट दिली पण तेथे त्याचा आवाज निवेदक म्हणून नाकारला गेला. मग वळला बॉलीवूड कडे. लंबू टांग जिराफासारखे पाय आणि घोड्या सारखे तोंड आहे म्हणून हिणावला गेला. तरीही 9-10 चित्रपट केले - ते सगळे दणकून आपटले. काम करीत राहिला - अपयश तेवढ्याच चिकाटीने मागे लागत राहिले.  अपयशी हिरो म्हणून नाव बदनाम झाले. पुन्हा परत कोलकात्त्याला जाण्याचे योजून बोडीया बिस्तारा बांधू लागला. आणि अचानक यशाचे दार धाडकन उघडले. जंजीर हीट झाला. तरी पण त्या काळात आम्हा मुलां मध्ये तो  कवी हरिवंशराय बच्चन ह्यांचा मुलगा म्हणून ओळखला जात होता कारण श्री हरिवंशराय ह्यांच्या कविता आम्हाला पाठयपुस्तकात होत्या. अमिताभ ने कुठे तरी सांगितलेली एक गोष्ट आठवते - संघर्षाच्या त्या कठीण काळात तो वरळी सी फेस वर चकरा मारायचा, तिथल्या बेंच वर बसून मका कणीस खात वेळ मारून न्यायचा, नंतर वरळी नाक्यावर असलेल्या सिटी बेकरी वर जाऊन बिस्किटे आणि केक खात उभा राहायचा - त्यावेळी बाजूला असलेल्या कुमकुम (आताचे नाव गीता) टॉकीज वर लागलेल्या राजेश खन्ना च्या चित्रपटाला उडालेली झुंबड आणि बुकिंग साठी उभ्या राहिलेल्या रसिकांची लांबच लांब रांग बघत उभा राहायचा आणि विचार करायचा माझ्या वाट्याला असे अफाट यश येईल का ? आणि कधी ? कधी?? कधी???

सात हिंदुस्थानी हा त्याचा पहिला चित्रपट. त्यानंतर त्याचे चित्रपट येत राहिले आणि पडत राहिले. "आनंद" चित्रपट आला. ह्या चित्रपटात त्याने फक्त ५००० रुपयात काम केले. ५००० रुपये त्यावेळी त्याची कोलकत्त्या मधल्या नोकरीमधला ३ महिन्याचा पगार होता! कारण त्याचा "आतला आवाज" सांगत होता की तुला इथेच काहीतरी करायचे आहे . "आनंद" मध्ये  जरी राजेश खन्ना भाव खाऊन गेला तरी उंच, शांत आणि गंभीर असणारा डॉक्टर भास्कर आणि शेवटी ज्यावेळी आनंद मारतो त्यावेळी ज्वालामुखीसारखा भडकणारा "बाबू मोशाय" डॉक्टर भास्कर पब्लिकच्या लक्षात राहिला. त्यानंतर त्याचे काही आणखी चित्रपट आले - महमूद ने त्याला "बॉंबे तो गोवा" मध्ये चान्स दिला. १९७३ ला "जंजीर" आला.  जंजीर नंतर एक वादळ बॉलीवूड वर पसरले - अँग्री यंग मॅन ह्या नावाने त्या वादळाने धुमशान मांडले - भले भले स्टार रुपी वृक्ष उखडले गेले - बॉलीवूड च्या तारांगणात एकच सूर्य तळपू लागला आणि बाकी सारे सितारे निष्प्रभ झाले. एके काळी रेडिओ सिलोन ने नाकारलेला आवाज अचानक भारदस्त असल्याचा साक्षात्कार इथल्या लोकांना झाला. पुढे "नमक  हराम" आला - तो पाहिल्यानंतर आमच्या पिढीची त्यावेळची प्रतिक्रिया होती कि " अमिताभ ने राजेश खन्ना ला कच्चा खाऊन टाकला". राजेश अमिताभ त्यानंतर एकत्र कधी दिसले नाहीत (नशीब चित्रपटाच्या गाण्याच्या एका सिक्वेन्स मध्ये दिले तेवढेच). त्यानंतर तो कामात अतिशय व्यग्र झाला. एके काळी वरळी सी फेस वर चकरा मारत वेळ कसा काढायचा हा प्रश्न त्यावेळी पडलेल्या अमिताभ ला आता दिवसाचे २४ तास पण कमी पडू लागले असतील. यशाच्या अफाट उंचीवर तो पोचला पण पाय जमिनीवर ठेवले. बॉलीवूड मध्ये यशाच्या शिखरावर असताना सेट वर दिलेल्या वेळी हजर असणारा तो एकमेव कलाकार असायचा. प्रोफेशनॅलिसम म्हणजे काय ते त्याने दाखवून दिले. आता हरिवंश राय बच्चन ह्यांना अमिताभ बच्चन चे वडील म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या मुलांच्या नावाने आपली ओळख करून दिली जावी अशी आई - बापाची इच्छा असते - अमिताभ ने ती पूर्ण केली. अमिताभ ला आपल्या वडिलांबद्दल अतिशय आदर होता. तो त्याच्या वागण्या बोलण्यातून - मुलाखतीत जेव्हा जेव्हा त्याच्या वडिलांचा उल्लेख येई तेव्हा तेव्हा तो आदर प्रकर्षाने जाणवत राहातो. त्यांच्या कविता जेव्हा अमिताभ सादर करतो तेव्हा वाटते कि खोल अर्थ असणाऱ्या हरिवंश राय ह्यांच्या कविता वाचण्यासाठी आणि सादर करण्यासाठी त्यांचा मुलगा अमिताभ ह्याचा गहिरा आवाज योग्य आहे ह्याची खात्री होते.

 1973 च्या जंजीर प्रदर्शित झाल्यानंतर चार दशकाहून जास्त काळ उलटला  - अमिताभ चे गारुड अजून तसेच आहे. मध्यंतरी तो कठीण कालखंडातून गेला. घरावर जप्ती यायची वेळ आली. रात्रीची झोप उडाली त्याची. परत कंबर कसून उभा राहिला. कदाचित कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही असे त्याने ठरवले असावे. चित्रपट असो, जाहिरात  असो, करोडपती सारखा प्रायोजित कार्यक्रम असो - सर्व त्याने स्वीकारले आणि यशस्वी करून दाखवले आणि त्याबरोबर स्वतः यशस्वी झाला. महानायक झाला. त्याच्या हि आयष्यात चढ उतार , सुख दु:ख, यश अपयश असे सर्व प्रसंग आले. सुरवातीला रेडिओ वर मिळालेला नकार, उंट आणि घोड्याचे तोंड असणारा लंबू नातं अशी झालेली हेटाळणी, नंतर मिळालेले अफाट यश, प्रेमाचा त्रिकोण, जीवघेणा अपघात, राजकारणात प्रवेश आणि तिथे मिळालेले अपयश, पुन्हा चित्रपट पण चुकीच्या निवडीमुळे अपयश, त्याच्या कंपनीचे वाजलेले दिवाळे, त्यातून पुन्हा चित्रपटाकडे आणि कौन बनेगा करोडपती सारख्या कार्यक्रमाकडे - पुन्हा वयाला साजेशे चित्रपट करण्याकडे आणि त्यानंतर प्राप्त केलेले स्थेर्य. तो सतत संघर्ष आणि प्रयत्न करत राहिला. त्याच्या ह्या संघर्षाचे मुळे आपल्या सारख्या सर्व सामान्यांना तो आपल्यातलाच एक वाटतो. त्याचे महानायक होणे असे सोपे न्हवतेच मुळी. एवढा मोठा होऊन हि " डाऊन टू अर्थ",  " सॉफ्ट स्पिकिंग", "सुसंस्कृत" अशी खास ओळख त्याने कायम ठेवली

असे मी कुठे तरी वाचले होते की  - सात हिंदुथानी जेव्हा रिलीज झाला होता त्यावेळी अमिताभ च्या उंची ची तर उडवणारे एक कार्टून त्यावेळी पब्लिश झाले होते - त्यात भारताचा नकाशा दाखवला गेला होता - त्यावर सहा हिंदुस्थानी झोपलेले दाखवले होते (पडेल चित्रपटाचे प्रतीक) आणि एक उंच माणूस (म्हणजे अमिताभ) मध्यभागी उभा दाखवला होता. १९६९-७० ला चित्रपटाची आणि अमिताभ ची टर उडवणारे हे कार्टून पुढे १९७३-७४ नंतर एक सत्य ठरले - त्यावेळी बॉलीवूड च्या साम्राज्यावर नव्हे तर पूर्ण हिंदूस्थानभर एकच उंच व्यक्तिमत्त्व ठळकपणे उभे होते आणि ते म्हणजे अमिताभचे. एका चॅनेल च्या अवार्ड फंक्शन मध्ये राजेश खन्ना ला अमिताभ हस्ते " लाईफ अचिव्हमेन्ट अवार्ड" देण्यात आले. बर्याच दिवसांनी त्यांना एकत्र स्टेज वर पाहायला मिळाले. त्यावेळी भावूक झालेल्या राजेश ला जुने स्पर्धेचे आणि त्याचे सोनेरी दिवस नक्कीच आठवले असतील - एके काळी तो सुपरस्टार होता आणि अमिताभ आता महानायक होता. टाइम हॅज चेंज्ड. पालटलेले दिवस आणि पलटलेली वेळ त्याने अनुभवली होतीच  - त्या एके काळी सुपरस्टार असताना त्याला अमिताभ चे वर्चस्व मान्य झाले नसेल, पण वेळ बदलत असते, प्रत्येकाचे दिवस येतात आणि जातात. सुपरस्टार पद मिळाल्यावर राजेश स्वतःला देव समजू लागला होता. तो स्वत:च म्हणाला होता " वयाच्या २१-२२ व्या वर्षी मी एवढा प्रसिद्ध झालो, लोक- मुली माझ्याचसाठी वेडे झाले होते, माझाच सर्वत्र उदो उदो होत होता, त्यामुळे मला मी खरोखर देव झाल्यासारखेच वाटायला लागले होते".  यश हातात आल्यावर अमिताभ बहकला न्हवता - यशाची नशा त्याच्या डोक्यात गेली न्हवती.  कदाचित अमिताभ च्या मनात गुरु दत्त च्या "  कागज के फूल" ची कथा खोलवर रुतून बसली असावी. इथले यश तकलादू आहे, इथली दुनिया बेगडी आहे, इथे फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतात आणि मावळत्या सूर्याकडे पाठ करतात ह्या सर्वाची त्याला जाणीव असावी आणि सुरुवातीला जे टक्के टोपणे खाले त्यामुळे तो अधिक मॅच्युयर झाला असावा. फक्त ठराविक सहकलाकारांशी मैत्री कायम ठेवत बॉलीवूड च्या ह्या झगमगत्या दुनियेत त्याने अलिप्तपणा जपला. लाईफ अचिव्हमेन्ट च्या अवार्ड फंक्शन च्या वेळी राजेश ला मागचे दिवस आठवले असतील. समारोप करताना अमिताभ कडे आणि प्रेक्षकांकडे  बघत तो म्हणाला होता " कल जहाँ मैं था वहा आज कोई और हैं - कल जहाँ मैं था वहा आज कोई और हैं  - वो भी एक दौर था ये भी एक दौर है"

"आतला आवाज" ऐकून त्याचा ध्यास घेणारे लोक कमी असतात - व्यवहाराच्या शुष्क रगाड्यात प्रायोरिटी बदलतात आणि हा आतला आवाज मागे पडतो आणि शेवटी दबून जातो.  काही लोक ह्या "आतल्या आवाजाने" जे सांगितले आहे ते करण्याचा ध्यास घेतात - त्याचा पाठपुरावा करतात आणि असे केल्याने जे काही साकार होते त्याचा अविष्कार महान असतो. अमिताभ ने ते साध्य केले आणि तो महानायक झाला. 

Sunday, 28 February 2016

"लस्ट फॉर लालबाग" - माझ्या आठवणीतला डिलाइल रोड

श्रीयुत विश्वास पाटील ह्यांस,

मी नुकतेच आपले "लस्ट फॉर लालबाग" हे पुस्तक वाचले. हे पुस्तक मला जुन्या काळात घेऊन गेले. आपण पण ह्या डिलाइल रोड परिसरात रहात होता का? असल्यास कुठे?

माझ्या लहानपणात. माझा जन्म गिरगावचा पण मी वाढलो डिलाइल रोड ला -  संभाजी नगर मध्ये. इथे आमची खोली होती आणि पुढे पानाची गादी. १९६१ चा माझा जन्म - मी १९७२ पर्यंत डिलाइल रोड ला रहात होतो. इराणी चाळ, लोहार चाळ, चाळ, समोर शिवाजी नगर  बाजूला बावळा मशीद, समोर सिमेंट चाळी. बाजूला मुनिसिपाल्तीची आमची शाळा - तिच्या बाजूला हरहर वाला बिल्डींग - पुढे दिन बिल्डींग - हुक्मील गल्ली - डब्बा (न्यू प्रकाश ) थेटर. करी रोड आणि चिंचपोकळी स्टेशना मध्ये पसरलेला हा परिसर. इथे प्रभात बेकरी चे पाव - कडक पाव - बन पाव छान बनवत असत. इकडे लोअर परेल आणि तिकडे बकरी अड्डा आणि पुढे सात रस्ता !

आमच्या चाळी समोर महाराष्ट्र वाच कंपनी नावाचे घड्याळाचे दुकान होते - फोटो स्टुडिओ होता - सावंतवाडी नावाचे मालवणी हॉटेल होते, सलून होते, पिठाची गिरणी होती - शंकर विलास नावाने गुलाबी चहा विकणारी हॉटेले होती

पूर्वी डब्बा टौकिज जवळ गोदरेज ची साबणाची कंपनी होती - मागे लालबाग ला ग्यास कमानी होती - वास येत असल्यामुळे आणि कोळशाची काजळी पसरत असल्याने (पुढे ग्यास कंपनी  ला आग लागल्याने) दोन्ही बंद झाल्या. 

इथले माझे बालपण मी कधीच विसरू शकणार नाही. एकत्र कुटुंब पद्धती आणि चाळी मध्ये एकोप्याने आणि सहकार्याने रहाणार्या - साधी रहाणीमान असणार्या त्या वेळच्या समाजाने फार चांगले संस्कार दिले. प्रत्येक चाळीत सार्वजनिक नळ असत, डबल बार आणि मल्लखांब दिसत, छोटी वव्यायामशाळा असे आणि सर्वात महत्त्वाचे छोटे का होईना मैदान असे. त्या मैदानात आम्ही वेगवेगळे खेळ खेळलो - डब्बा ऐसपैस, लगोरी - आबा धुबी, कबड्डी, विटी दांडू, क्रिकेट, छत्री ची तार वाकवून लोखंडी रिंग गाडी म्हणून चालवणे, पतंग  उडवणे, गोट्या (कान घष्टी - राजा राणी - कोयबा), कांदा चिरी, लंगडी, आट्या पाट्या, सागरगोटे, दोरीच्या उड्या, उभा आणि बैठा खो खो, दांड पट्टा, लेझीम, पकडा पकडी - असे किती तरी खेळ.  

त्यावेळचे जीवन गिरणी कामगार आणि त्यांच्या आयष्यशी निगडीत असलेल्या अर्थ् व्यवस्थेवर आधारलेले होते. पान तंबाखूची दुकाने,  चणे भेळवाले वाले, लक्ष्मी विलास चहा च्या टपर्या, कापडाची -  भांड्यांची दुकाने, दवाखाने, शाळा,  फूटपाथवर  बसणारे भाजी वाले, कान कोरणारे, स्टोव - बादल्या रिपेर करणारे, कल्हैवाले-मिठ्वाले-पिंजारी, दरवेशी, तेल मालिश करणारे, डोंबारी, वासुदेव, नंदी बैल वाले आणि  कितीतरी.
मनोरंजनाची  साधने पण विविध होती: भजने -  भारुड, बाल्या डान्स, चाळी मध्ये होणार्या  स्पर्धा,रेकोर्ड डान्स, कबड्डीचे सामने,  विवेकानंद व्याख्यानमाला, पुरंदरे ह्यांची शिव व्याख्यानमाला, तमाशा-वग - गौळण -नाटके आणि रस्त्यावर दाखवले जाणारे सिनेमा - एखाद दुसरे डब्बा थिएटर. साधी पण संस्कार करणारी समाजाभिमुख अशी ही साधने होती ज्यांनी संस्कारक्षम पिढी तयार केली. सर्व सण  धामधुमीत साजरे होत. कामगार  वर्गाची मुले चिवट, मेहनती, प्रामाणिक होती - अगदीच नाइलाज झाला तेव्हा कदाचित ती गुन्हेगारी मार्गाला  लागली असतील - पण मनाच्या एका कोपर्यात माणुसकीचा झरा वहात होता म्हणूनच कि काय इंदाराम ने नयनी च्या पायावर गोळ्या झाडल्या तिच्या छातीवर नाही !
६० च्या दशकात हा परिसर जिवंत वाटायचा - तीन शिफ्ट सारखा गिरणी कामगारांचा लोंढा आणि जथे  रस्त्या वरून वहात असत. गिरण्यांच्या भोंग्यावरून टाईम लावला जात असे. दुकानांमधून गर्दी डोकावत असे - मैदाने आणि फूटपाथ भरलेले असत. रात्री २ ते सकाळी पाच एवढा वेळ हा परिसर त्यातल्या त्यात शांत असे. संप झाल्यावर ह्या गिरणगावाची रया गेली ती पुन्हा  आलीच नाही. त्यानंतर ह्या परिसरात फिरताना काही तरी चुकल्या सारखे वाटत असे. पुढे आम्ही वरळी ला  रहायला गेलो. हा परिसर "तसा" पुन्हा जिवंत झालाच नाही. आज पडलेल्या गिरण्या - काहींच्या चिमण्या - उभे राहिलेले टावर पाहून जीव हळहळतो - त्या पडक्या चिमण्या आणि भिंती पाहून टायट्यानिक चित्रपटात दाखवल्या प्रमाणे मन भूतकाळात फ्ल्याश ब्याक मध्ये जाते आणि त्या पडक्या भिंती आणि चिमण्या डोळ्यासमोर त्यावेळचा परिसर जिवंत करतात - कामगारांची लगबग दिसू लागते  - तुमच्या सदरच्या कादंबरी ने तो काल तसाच जिवंत केला.
आज पुन्हा तो परिसर गजबजू  लागला आहे - पण पूर्वीच्या गर्दी ची गम्मत आणि आपुलकी आजच्या क्राउड मध्ये नाही - आजचा हा क्राउड परका वाटतो - हि आपली संस्कृती वाटत नाही - हा आपला परिसर वाटत नाही - संप झाला - सरकारने मोडून काढला - कामगार संपवला - गिरणगाव संपवले - अन्न, वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजांपैकी " वस्त्र" हि गरज इथल्या गिरण्या आणि इथे जीव तोडून काम करणारे कामगार पुरवत होते - आज इथे गिरण्या नाहीत - हि गरज आता दुसरीकडून भागवली जाते - पण एके काळी मुंबई च्या अर्थकारणाच्या नाड्या असलेल्या ह्या गिरण्या आणि त्या चालवणारे कामगार आणि इथली वस्ती त्या सर्वांचा एक हिस्सा असणारे आम्ही आणि एके काळी तिथे राहिलेली आणि आता रहाणारी त्या काळची पिढी ह्या जन्मात तरी विसरणार नाही