Sunday, 28 February 2016

"लस्ट फॉर लालबाग" - माझ्या आठवणीतला डिलाइल रोड

श्रीयुत विश्वास पाटील ह्यांस,

मी नुकतेच आपले "लस्ट फॉर लालबाग" हे पुस्तक वाचले. हे पुस्तक मला जुन्या काळात घेऊन गेले. आपण पण ह्या डिलाइल रोड परिसरात रहात होता का? असल्यास कुठे?

माझ्या लहानपणात. माझा जन्म गिरगावचा पण मी वाढलो डिलाइल रोड ला -  संभाजी नगर मध्ये. इथे आमची खोली होती आणि पुढे पानाची गादी. १९६१ चा माझा जन्म - मी १९७२ पर्यंत डिलाइल रोड ला रहात होतो. इराणी चाळ, लोहार चाळ, चाळ, समोर शिवाजी नगर  बाजूला बावळा मशीद, समोर सिमेंट चाळी. बाजूला मुनिसिपाल्तीची आमची शाळा - तिच्या बाजूला हरहर वाला बिल्डींग - पुढे दिन बिल्डींग - हुक्मील गल्ली - डब्बा (न्यू प्रकाश ) थेटर. करी रोड आणि चिंचपोकळी स्टेशना मध्ये पसरलेला हा परिसर. इथे प्रभात बेकरी चे पाव - कडक पाव - बन पाव छान बनवत असत. इकडे लोअर परेल आणि तिकडे बकरी अड्डा आणि पुढे सात रस्ता !

आमच्या चाळी समोर महाराष्ट्र वाच कंपनी नावाचे घड्याळाचे दुकान होते - फोटो स्टुडिओ होता - सावंतवाडी नावाचे मालवणी हॉटेल होते, सलून होते, पिठाची गिरणी होती - शंकर विलास नावाने गुलाबी चहा विकणारी हॉटेले होती

पूर्वी डब्बा टौकिज जवळ गोदरेज ची साबणाची कंपनी होती - मागे लालबाग ला ग्यास कमानी होती - वास येत असल्यामुळे आणि कोळशाची काजळी पसरत असल्याने (पुढे ग्यास कंपनी  ला आग लागल्याने) दोन्ही बंद झाल्या. 

इथले माझे बालपण मी कधीच विसरू शकणार नाही. एकत्र कुटुंब पद्धती आणि चाळी मध्ये एकोप्याने आणि सहकार्याने रहाणार्या - साधी रहाणीमान असणार्या त्या वेळच्या समाजाने फार चांगले संस्कार दिले. प्रत्येक चाळीत सार्वजनिक नळ असत, डबल बार आणि मल्लखांब दिसत, छोटी वव्यायामशाळा असे आणि सर्वात महत्त्वाचे छोटे का होईना मैदान असे. त्या मैदानात आम्ही वेगवेगळे खेळ खेळलो - डब्बा ऐसपैस, लगोरी - आबा धुबी, कबड्डी, विटी दांडू, क्रिकेट, छत्री ची तार वाकवून लोखंडी रिंग गाडी म्हणून चालवणे, पतंग  उडवणे, गोट्या (कान घष्टी - राजा राणी - कोयबा), कांदा चिरी, लंगडी, आट्या पाट्या, सागरगोटे, दोरीच्या उड्या, उभा आणि बैठा खो खो, दांड पट्टा, लेझीम, पकडा पकडी - असे किती तरी खेळ.  

त्यावेळचे जीवन गिरणी कामगार आणि त्यांच्या आयष्यशी निगडीत असलेल्या अर्थ् व्यवस्थेवर आधारलेले होते. पान तंबाखूची दुकाने,  चणे भेळवाले वाले, लक्ष्मी विलास चहा च्या टपर्या, कापडाची -  भांड्यांची दुकाने, दवाखाने, शाळा,  फूटपाथवर  बसणारे भाजी वाले, कान कोरणारे, स्टोव - बादल्या रिपेर करणारे, कल्हैवाले-मिठ्वाले-पिंजारी, दरवेशी, तेल मालिश करणारे, डोंबारी, वासुदेव, नंदी बैल वाले आणि  कितीतरी.
मनोरंजनाची  साधने पण विविध होती: भजने -  भारुड, बाल्या डान्स, चाळी मध्ये होणार्या  स्पर्धा,रेकोर्ड डान्स, कबड्डीचे सामने,  विवेकानंद व्याख्यानमाला, पुरंदरे ह्यांची शिव व्याख्यानमाला, तमाशा-वग - गौळण -नाटके आणि रस्त्यावर दाखवले जाणारे सिनेमा - एखाद दुसरे डब्बा थिएटर. साधी पण संस्कार करणारी समाजाभिमुख अशी ही साधने होती ज्यांनी संस्कारक्षम पिढी तयार केली. सर्व सण  धामधुमीत साजरे होत. कामगार  वर्गाची मुले चिवट, मेहनती, प्रामाणिक होती - अगदीच नाइलाज झाला तेव्हा कदाचित ती गुन्हेगारी मार्गाला  लागली असतील - पण मनाच्या एका कोपर्यात माणुसकीचा झरा वहात होता म्हणूनच कि काय इंदाराम ने नयनी च्या पायावर गोळ्या झाडल्या तिच्या छातीवर नाही !
६० च्या दशकात हा परिसर जिवंत वाटायचा - तीन शिफ्ट सारखा गिरणी कामगारांचा लोंढा आणि जथे  रस्त्या वरून वहात असत. गिरण्यांच्या भोंग्यावरून टाईम लावला जात असे. दुकानांमधून गर्दी डोकावत असे - मैदाने आणि फूटपाथ भरलेले असत. रात्री २ ते सकाळी पाच एवढा वेळ हा परिसर त्यातल्या त्यात शांत असे. संप झाल्यावर ह्या गिरणगावाची रया गेली ती पुन्हा  आलीच नाही. त्यानंतर ह्या परिसरात फिरताना काही तरी चुकल्या सारखे वाटत असे. पुढे आम्ही वरळी ला  रहायला गेलो. हा परिसर "तसा" पुन्हा जिवंत झालाच नाही. आज पडलेल्या गिरण्या - काहींच्या चिमण्या - उभे राहिलेले टावर पाहून जीव हळहळतो - त्या पडक्या चिमण्या आणि भिंती पाहून टायट्यानिक चित्रपटात दाखवल्या प्रमाणे मन भूतकाळात फ्ल्याश ब्याक मध्ये जाते आणि त्या पडक्या भिंती आणि चिमण्या डोळ्यासमोर त्यावेळचा परिसर जिवंत करतात - कामगारांची लगबग दिसू लागते  - तुमच्या सदरच्या कादंबरी ने तो काल तसाच जिवंत केला.
आज पुन्हा तो परिसर गजबजू  लागला आहे - पण पूर्वीच्या गर्दी ची गम्मत आणि आपुलकी आजच्या क्राउड मध्ये नाही - आजचा हा क्राउड परका वाटतो - हि आपली संस्कृती वाटत नाही - हा आपला परिसर वाटत नाही - संप झाला - सरकारने मोडून काढला - कामगार संपवला - गिरणगाव संपवले - अन्न, वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजांपैकी " वस्त्र" हि गरज इथल्या गिरण्या आणि इथे जीव तोडून काम करणारे कामगार पुरवत होते - आज इथे गिरण्या नाहीत - हि गरज आता दुसरीकडून भागवली जाते - पण एके काळी मुंबई च्या अर्थकारणाच्या नाड्या असलेल्या ह्या गिरण्या आणि त्या चालवणारे कामगार आणि इथली वस्ती त्या सर्वांचा एक हिस्सा असणारे आम्ही आणि एके काळी तिथे राहिलेली आणि आता रहाणारी त्या काळची पिढी ह्या जन्मात तरी विसरणार नाही

No comments:

Post a Comment