Thursday, 31 December 2015

Mangesh Padgaonkar




मंगेश पाडगावकर - कविता जगणारा तरल आणि संवेदनशील मनाचा भावुक कवी. लहानपणापासून ह्यांच्या कविता अभ्यासक्रमात शिकलो - त्या सहज पाठ व्हायच्या. मराठी मनांवर त्यांनी एक वेगळाच ठसा उमटवून ठेवला आहे - तो मागच्या दोन पिढ्यांना सहजा सहजी विसरता येणार नाही. "प्रेम" आणि "जगणे" हा त्यांच्या कवितांचा मुख्य विषय असायचा तरीही ह्या प्रतिभाशाली कवीने बालगीते, बडबडगीते, लिज्जत साठी पावसाची गीते तितक्याच सहजतेने लिहिली.  जीवन गाणे जगण्याचे उमेद देणार्या - जगायचे कसे ते सांगणार्या त्यांच्या कविता पार मनामध्ये घर करून रहात.

"ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे"  ह्या कवितेत जगण्याची उमेद सांगताना ते जन्मभूमीचे महत्त्व पुढील ओळीत सहजतेने पण तितक्याच उर्मीने व्यक्त करतात  " या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती; अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी; इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे" . कोकणात वेंगुर्ल्याला जन्मलेल्या ह्या कवीला आपल्या मातृभूमीची ओढ कायम होती.  आपल्या मुलाना ते येथे घॆउन येत आणि मायभूमीची महती सांगत. २०१३ मध्ये त्याना कृष्णा चामान्कारांनी सन्मानपूर्वक वेंगुर्ल्यात आणले होते आणि त्यांचा सत्कार केला होता - त्यावेळी ते आपल्या उभा दांडा येथे असलेल्या शाळेत गेले होते आणि विद्यार्थ्याना "वेंगुर्ल्या चा पाउस कसा माया करत यायचा" हि कविता म्हनून दाखवली

प्रेम म्हणजे प्रेम असत , बरेच दिवस कुणासाठी झुरलो नाही, तू असतीस तर झाले असते गडे उन्हाचे गोड चांदणे ह्यासारख्या प्रेम विषयावरच्या कविता तरुण मनाला भुरळ घालतात. "जिप्सी" हि कविता आणि "सबको सलाम" ही कविता विचारी मनाला अंतर्मुख करायला लावते. "सांगा कस जगायचं" आणि "अखेरची वही" ह्या कविता आयुष्याच्या संध्याकाळचे तत्त्वज्ञान सांगते आणि जीवनानंतर असलेल्या गूढ अज्ञाताची जाणीव करून देते.

मी मुंबई ला पिंटोविला हायस्कूल मध्ये होतो. १० वी एस एस सी झाले होते त्या वेळी. आम्ही ९ वी मध्ये असताना क्लास टीचर कारूळकर सरांनी ९ वी च्या शेवटच्या दिवशी आम्हा सर्वाना १० वी साठी शुभेच्छा देताना निरोप समारंभाच्या वेळी भावूक होताना पाडगावकरांच्या कवितेच्या काही ओळी म्हटल्या होत्या - "अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती .. दोन दिसांची रंगत संगत .. दोन दिसांची नाती .." सरांबरोबर आम्ही मुलेही भावुक झालो होतो आणि घशाशी आवंढा दाटून आला होता. त्या प्रसंगामुळे पाडगावकरांच्या कवितेचा भावार्थ मनात पक्का रुजून बसला - फक्त एक ओळ - "अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती" - जी सर्व आशय सांगून जाते - ह्यातच पाडगावकरांची प्रतिभा किती उच्च कोटीची होती ते दिसून येते. पाडगावकर आणि त्यांच्या कविता निदान आमची पिढी तरी विसरू शकणार नाही.

Prakash Sawant

No comments:

Post a Comment