Wednesday, 16 September 2015

गणपती बाप्पा मोरया ...

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. ब्रिटीश काळात स्वातंत्र्या बद्दल जागृती निर्माण करण्यासाठी जनमाणसाना एकत्र आणण्याचा त्यांचा उद्देश होता. गणेशोत्सव जनमानसात रुजला - लोकमान्यांनी ज्या हेतूने चालू केला तो सफल झालाच पण ह्या उत्सवामुळे एक नवचैतन्य लोकमानसात निर्माण झाले.

कोकणात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात गणपती उत्सव साजरा होतो. त्याची लगबग श्रावणातच - नागपंचमी पासून चालू होते. कोणत्याही परिस्थितीत चार दिवस सुट्टी काढून कोकणी माणूस गावाकडे ह्यासाठी हजर होतोच. पाच दिवसाच्या ह्या सोहोळ्यात तन मन धन अर्पून सामील होतो. मूर्ती सांगणे, गणेश स्थापना करणे, आरत्या, भजने - मोठा थाट उडून जातो. वातावरण उत्साहवर्धक असते, सर्वत्र हिरवळ पसरलेली असते, हिरवीगार भातशेती उभी असते, परसात मांडवावर काकड्या, टरबूज, चिबूड झुलत असतात, पावसाच्या सरी मधून मधून पडत असतात, वहाळ - विहिरी पाण्याने भरलेली असतात आणि गावातील सर्व घरे बाया बापड्यानी भरलेली असतात.  कुटुंबातल्या सर्वाना एकदम एकाच वेळी सुट्ट्या घ्यायला जमत नसेल त्यामुळे काही जणांनी सण साजरा करण्याच्या सोयीसाठी  "वर्सल" पद्धत सुरू केली असावी. सर्वच कार्ये ह्या दरम्यान एकदिलाने केली जातात; विसर्जन पण एकदम जोशात केले जाते; पण विसर्जन करून घरी परतल्यावर गणपतीविना असलेला मंडप पाहिल्यावर सर्व जोश ओसरून जातो. पाच दिवसात न आठवलेल्या कामाच्या गोष्टी, नोकरी धंद्याच्या कटकटी पुन्हा डोकी वर काढतात.आणि पुन्हा रुटीन सुरू होते ते सरळ थांबते ते पुढील वर्षीच्या गणपती उत्सवापर्यंत! गणेश उत्सव हा दर वर्षी असा येत रहातो - उत्साहाचे उधाण आणत रहातो - आणि चाकरमानी तो तेवढ्याच नेमाने आणि जोमाने साजरा करतो. हा जोम, हे उधाण, हा जोश आणि हे चार दिवस पुढच्या वर्षभरात येणार्या उरलेल्या दिवसांना सामोरे जाण्याचे , संघर्ष करण्यासाठीचे उर्जा स्त्रोत देवून जातात

उद्या श्री गणेशाचे आगमन होत आहे - वरदविनायक, चिंतामणी, विघ्नहर्ता गणपती सर्वांची विघ्ने दूर करो, योजिलेले कार्य सिद्धीस नेवो, सर्वाना सदबुद्धी देवो आणि जीवन मंगलमय करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...  

गणपती बाप्पा मोरया ...

No comments:

Post a Comment