Thursday, 14 September 2023

मुंबई ची डबल डेकर

 मुंबईत डबल डेकर बस बंद होणार अशी बातमी वाचण्यात आली. ८६ वर्षापूर्वी म्हणजे १९३७-३८ च्या दरम्यान जेव्हा डबल डेकर सुरु झाली असेल त्यावेळी तिचे काय अप्रूप असेल ? आम्ही लहान असतांना पण डबल डेकर चे खूप आकर्षण वाटायचे. बऱ्याचदा मोठ्या माणसांबरोबर डबल डेकर मध्ये बसायचा योग्य आला पण तो खालच्या डेकवर- ही मोठी माणसे वर का चढत नाहीत नाहीत बसच्या वरच्या मजल्यावर अशी खंत वाटायची आणि त्यांचा रागही यायचा. एकदा हा योग्य आला. खालचा डेक भरलेला असल्याने कंडक्टर वर जा वर जा असे ओरडत होता त्यामुळे वरच्या मजल्यावर जायचा चान्स एकदाचा मिळाला. वरचा मजला हवेशीर वाटला. वरून खाली पाहायला मजा वाटत होती. ड्रायव्हर च्या वर तर सीट्स होत्या. अरे वरच्या मजल्याचा ड्रायव्हर कुठे गेला असे मी विचारलेले आठवते. त्याबरोबर बाजूच्या सीटवर बसलेली माणसे का हसली ते मला कळले नाही पण माझ्या डोक्यावर काकांनी टपली मारली- म्हणाले ड्रायव्हर खालीच असतो. पण त्यावेळी बालमनाला वर ड्रॉयव्हर का नाही हा त्यावेळी पडलेला मोठा प्रश्न अजूनही मला आठवतो. त्यानंतर थोडे मोठा झाल्यावर शाळेत जाताना मी एकट्याने प्रवास करू लागलो. त्यावेळी मी वरच्या मजल्यावर बसायलाच प्राधान्य द्यायचो. वरच्या मजल्यावर आवडीची सीट म्हणजे ड्रायव्हर च्या वरची सीट. तेथे बसून समोरून येणारी हवा खात समोर दिसणारी दृश्य पाहात प्रवास करायला मजा यायची. शाळेतील मित्र जर वरच्या सीटवर बसले तर मग वेगळोच धमाल. एखादा मस्तीखोर तर हॅन्डल फिरवून नंबर बदलायचा किंवा प्रवास दर्शक फिरवायचा. नंबर बदलला तर वरून पुढच्या स्टॉप वर चढणाऱ्या प्रवाशांचा बसकडे (भलताच नंबर दिसल्याने) बघताना होणार गोंधळ बघून एक वेगळीच फीलिंग यायची. मग आमच्यातला एखादा दोन तीन स्टॉप गेल्यावर परत हॅन्डल फिरवून मूळ नंबर आणून ठेवायचा. डबल डेकर मध्ये खाली बसायचे असेल तर माझी आवडती सीट होती बस मध्ये चढल्यावर डावीकडे आणणारी आडवी सीट. ह्या सीट च्या खिडकी कडे बसायचे आणि गर्दी नसेल तर बस च्या मागे पळणारा रस्ता पहात राहायचा. ह्या सीट वर चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या माणसांच्या असंख्य व्यक्तिरेखा बघायला मिळायच्या. रांगेतुन येऊन चढणारे, काही शेवटच्या क्षणी उडी मारून पकडणारे, सिग्नल ला बस थांबल्यावर चढण्याचा चान्स घेणारे, काही सिग्नल ला चढल्याचे कंडक्टर च्या ध्यानात आल्यावर अपमानित करून उतरवले जाणारे, कुटुंबकबिल्यासोबत चढण्याची धडपड करणारे, घुसखोरी करून चढणारे टगे, प्रवाशांची आपसातली भांडणे, प्रवाशांची कंडक्टर बरोबरची भांडणे, बस रिकामी असूनही जिन्या जवळच्या हॅन्डल ला पकडून बस च्या फुटबोर्ड वर उभे राहून प्रवास करणारे, प्रवाशांची आपसातली सामान- भाजी- लगेज घेऊन ते दरवाज्या जवळच्या सामानाच्या पिंजऱ्यात ठेऊन प्रवास करणारे (त्यावेळी बसमध्ये सामान ठेवण्यासाठी पिंजरे असायचे आणि अधिकृत पणे सामान नेता यायचे- पुढे हे पिंजरे बंद केले आणि नुसती मोकळी जागा ठेवली गेली), दरवाजात चढून तेथेच उभे राहून दोन स्टॉप गेल्यावर तिकीट न काढता उतरणारे  फुकटे ... असे किती तरी अनुभव डबल डेकर च्या बस ने दिले ... 

वरच्या आणि खालच्या कंडक्टर  चे वेगळेच को-ऑर्डिनेशन असायचे. वरून उतरणारे बरेच पॅसेंजर्स असतील तर वरचा कंडक्टर सिंगल बेल मारायचा आणि पँसेंजर्स जिना उतरून खाली गेले कि डबल बेल मारायचा. वरच्या आणि खालच्या कंडक्टर चे जर जमत नसेल किंवा पटत नसेल तर हा ताळमेळ विस्कटून जायचा. सहसा वरच्या मजल्यावर स्टँडिंग प्रवाशी ठेवायला अनुमती न्हवती पण खूप गर्दी असेल तर मात्र वरच्या मजल्यावर उभे प्रवाशी घेतले जायचे. 


आज डबल डेकर बंद होणार ही बातमी वाचल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. डबल डेकर मुंबई ची शान होती, मुंबई ची एल वेगळी ओळख होती.. आता ती मिटली जाणार हे ऐकून आपल्या आयुष्यातील एक वेगळे पर्व संपल्यासारखी जाणीव होतेय हे तेवढेच खरे ... 

Prakash Sawant

14 Sep 2023

Thursday, 2 March 2023

रेडिओ दिनाच्या निमित्ताने

रेडिओ एके काळी सर्वांच्या जीवनाचा - मनोरंजनाचा अविभाज्य भाग होता.  त्याकाळी रेडिओ वाल्व चे होते त्यामुळे त्यांचा आकार मोठा असायांचा. बहुतेक घरात रेडिओ उंचावर कपाटावर अथवा भिंतीवर फळी मारून (लहान मुलांनी हात लावू नये म्हणून) वर ठेवलेला असायचा. रेडिओ ला शोभा यावी म्हणून खास वेलवेट चे कापड बाहेरून लावलेले असायचे. रेडिओ चार बँड चा असायचा - काटा फिरवून  स्टेशन ट्यून झाले की नाही ते कळण्यासाठी एका काचेच्या गॅप मध्ये “हिरवा दिवा" असायचा - दोन हिरवे बँड एकत्र झाले की स्टेशन लागले ह्याची खातरजमा व्हायची. रेडिओ सुरु केल्यावर दोन ते पाच मिनिटांनी लागायचा. वाल्व गरम व्हायला वेळ लागायचा. पुढे डायोड आले. रेडिओ चा आकार कमी झाला. गळ्यात घालायचे ट्रांझिस्टर आले आणि नंतर खिशात घेऊन जायचे पॉकेट रेडिओ आले. रेडिओ चे कार्यक्रम वर्तमानपत्रात दिले जायचे. रेडिओ टाइम वर लोकांच्या वेळा लावल्या जायच्या. रेडिओवर दिली गेलेली बातमी ऑथेंटिक समजली जायची. एखाद्याचा रेडिओ वर कार्यक्रम असला की त्याची कॉलर एकदम कडक होऊन जायची. 


मराठी कार्यक्रमांमध्ये: पहाटेची भक्ती गीते (त्यात ‘माटी कहे कुम्हार से’हे गाणे हमखास असायचे), पुन्हा प्रपंच (ज्यात तत्कालीन घडामोडींवर भाष्य असायचे), कामगार सभा (विशेषतः शनिवारी लोकगीते आमी कोळीगीते लागायची), लहान मुलांसाठी गम्मत जम्मत कार्यक्रम, रात्री श्रुतिका, आपली आवड (ह्यात आपण सांगितलेले गाणे लावतात का आणि आपले नाव घेतात का ह्याची उत्सुकता जास्त असायची). 


हिंदी कार्यक्रमांमध्ये: विविध भारती  वरील छायागीत, भुले बिसरे गीत, इनसे मिलीये आणि जयमाला हे विशेष कार्यक्रम आवडीने ऐकले जात. शनिवारी एखादी प्रसिद्ध व्यक्ती जयमाला सादर करायची - सुनील गावस्कर, अमिताभ बच्चन, करसन घावरी, धर्मेंद्र ह्यांच्या जयमाला ऐकलेल्या आठवतात. त्याकाळी व्हिडीओ नसल्याने सिनेमा प्रमोशन साठी लावले जाणारे प्रायोजित कार्यक्रम आवर्जून ऐकले जायचे. हवा महल ची विशेष ट्यून लागली की समजायचे की सव्वा नऊ वाजलेत आणि साडेनऊ पासून दहा वाजे पर्यंत प्रायोजित कार्यक्रम लागणार आहेत आणि दहा वाजता छायागीत. रविवारी  एखाद्या चित्रपटाचा साऊंड ट्रॅक लावला जायचा. जुन्या गाण्यांसाठी ऑल इंडिया रेडिओ ची उर्दू सर्व्हिस लावली जायची आणि बुधवारी बिनाका गीतमाला साठी रेडिओ सिलोन! अधून मधून अहमदाबाद बडोदा स्टेशन लावले जायचे.  क्रिकेट चालू असताना तर शाळा कॉलेज अभ्यास विसरून रेडिओला वेढा घालून बसले जायचे 


मध्यंतरी कॅसेट प्लेयर आले, सी डी प्लेयर आले, व्ही सी डी आले त्याबेली रेडिओ ची प्रसिद्धी कमी झाली. लोकांनी कार मध्ये कॅसेट / सी डी प्लेयर लावून घेतले. लोकांचे दुर्लक्ष झाले. रेडिओ विस्मृतीत जाऊन इतिहास जमा होतो की काय असे वाटायला लागले. पण पुढे एफ एम सुरु झाले. रेडिओ ने कात टाकली. कार मध्ये आता लोकं रेडिओ ऐकू लागलेत. मोबाईल मध्ये रेडिओ ट्यून केला जाऊ शकतो. वेगवेगळी रेडिओ ची ऍप  आलीत. इंटरनेट वर पण रेडिओ ट्यून करू शकतो. पूर्वीइतका पॉप्युलर नाही पण रेडिओ पुनर्जीवित झाला आहे हे ही नसे थोडके !

प्रकाश दिगंबर सावंत 

०२ मार्च २०२३ 


Sunday, 19 February 2023

मला आवडलेले पुस्तक - काळोख आणि पाणी (अरुणा ढेरे लिखित)

महाभारतात नाही ते जगांत नाही असे म्हणतात - "काळोख आणि पाणी" ह्या श्रीमती अरुणा ढेरे लिखित पुस्तकात मानवी स्वभावाचे अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत. उत्तुंग वाटणाऱ्या व्यक्तिमत्वांची पावले शेवटी मातीचीच होती हे प्रकर्षाने जाणवते. ह्या संग्रहात अनेक अशा कथा आल्या आहेत ज्या कधी ऐकल्या अथवा वाचल्या न्हवत्या. कधी तरी आजी च्या तोंडून "आज शेषाची पाळी" ची कथा ऐकलेली अंधुकशी आठवते. महाभारत, त्यातील व्यक्तिरेखा, त्यांच्या वर्तवणुकीचे विश्लेषण, त्यांच्या वर्तवणुकीची जनमानसावर पडलेली छाप आणि त्यातून जन्मलेल्या (आपण न वाचलेल्या) कथा ह्या पुस्तकात दिलेल्या आहेत ज्या आपणाला अंतर्मुख करून सोडतात. गांधारीची धृतराष्ट्र आणि दुर्योधनामध्ये होणारी कुचंबणा, धृतराष्ट्राचा अप्पलपोटेपणा, भीष्मांची स्त्रियांबद्दलची निरीच्छ वृत्ती. दुर्योधनाचा युद्धाच्या शेवटी त्याला जाणवलेला एकाकीपणा, रितेपण आणि ऐन युद्धाच्या समरप्रसंगी आलेली निरागस बालपणाची आठवण - त्यांचे कौरव पांडवांचे एकत्र खेळण्याचे चांगले दिवस त्याला आठवतात तो क्षण आपणाला पण हळवे करून सोडतो, जीवन संघर्षाचा फोलपणा जाणवून देतो. कितीतरी असे पैलू ह्यात वाचायला मिळतात. आदिमायेची रक्ताची आस, तिची द्रौपदी शी जोडलेली नाळ आणि कृष्णाच्या पायाला बाण लागून अवतारपूर्ती च्या वेळी सांडलेला रक्ताचा थेंब त्या आदिमायेच्या रक्ताची आस पूर्ण करणार आहे काय? विशेष करून "कुंतीचा नातू" ही कथा वेगळाच आशय मांडून आपणाला जीवनाचे तत्वज्ञान सांगून जाते
- प्रकाश दिगंबर सावंत 
- १० फेब्रुवारी २०२३