Tuesday, 11 October 2016

शास्त्र आणि शस्त्र

कालच एक पोस्ट पाहिली. मोदी साहेब दसर्याच्या मुहूर्तावर जवानांशी संवाद साधत होते - आणि लढाईच्या आयुधांची पूजा करताना दाखवले होते. त्यावर पोस्ट वर टिप्पण्णी अशी होती - कि या आधी आपण कधी भारतीय नेत्याला सणाच्या दिवशी जवानांशी संवाद करताना आणि आयुधांची पूजा करताना पाहिले होते का? ती पोस्ट पहाताना लक्षात आले कि आपण असे कधी या पूर्वी पाहिले नाही आणि पाहिले असले तर आता लक्षात नाही. आता सोशल मीडिया मुळे ह्या गोष्टी आपल्या पर्यंत पोहोचू शकतात. 

हि पोस्ट पहाताना एक गोष्ट ध्यानात आली कि जीवनात आयुधे आणि हत्यारे ह्यांचे एक स्थान असले पाहिजे. आपल्या संस्कृतीत शस्त्रे आणि शास्त्रे ह्या दोन्ही गोष्टींना महत्त्व दिलेले आहे. देवी देवतांच्या हातात शस्त्रे आणि शास्त्रे दोन्ही धारण केली असतात. शास्त्रे सर्वानी शिकून शिक्षित होणे आवश्यक आहे तेवढेच शस्त्र धारण करून ती चालवण्यात पारंगत होणे तितकेच जरुरी आहे. शास्त्रे स्व:शिक्षणासाठी आणि शस्त्रे स्व:रक्षणासाठी! शस्त्रांचा वापर करण्यासाठी योग्य निर्णय करणे आपसुक आहे ज्यासाठी मन संतुलित असणे आवश्यक आहे - जे शास्त्रे शिकून अवगत करता येते. 

काळाच्या ओघात शास्त्रे हरवली आणि अहिंसे च्या स्वीकृतीनंतर शस्त्रे म्यान केली गेली. प्राचीन महत्त्व पूर्ण ज्ञान विस्मृतीत गेले आणि म्यान केलेल्या शस्त्रांमुळे भारत वर्षातील क्षात्र तेज लोप पावत गेले. दसर्याच्या मुहूर्तावर आलेल्या मोदींच्या पोस्ट मुळे ह्या विचारांना वाचा फुटली. आज उठ सुठ शस्त्रे हातात घेणे योग्य नाही पण निदान देश हित लक्षात न ठेवता सर्जिकल स्ट्राईक वर वाचाळपणे वाट्टेल ते बरळनाऱ्या आपल्या नेत्यांनी, पत्रकारांनी, बॉलीवूड कलाकारांनी आणि तथाकथित सेलेब्रेटीज नी आपल्या जिभेवर ताबा ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे. ह्या वाचाळ वीरांना अशी विनंती आहे कि जिभेचे शस्त्र म्यान करा आणि आयुधे हातात घेऊन निदान सहा महिने लष्करी सेवा करण्यासाठी सीमेवर जा. दसर्याच्या शुभेछा

११ ऑक्टोबर २०१६

अमिताभ बच्चन - नॉट आउट 74

तो कोलकात्त्याला नोकरीला होता. "आतला" आवाज त्याला कला क्षेत्रात जायला सुचवत होता. त्या "आतल्या" आवाजाची आज्ञा मानून त्याने मुंबई ला प्रस्थान केले. रेडिओ सिलोन साठी निवेदक म्हणून आपल्या भारदस्त "आवाजाची" टेस्ट दिली पण तेथे त्याचा आवाज निवेदक म्हणून नाकारला गेला. मग वळला बॉलीवूड कडे. लंबू टांग जिराफासारखे पाय आणि घोड्या सारखे तोंड आहे म्हणून हिणावला गेला. तरीही 9-10 चित्रपट केले - ते सगळे दणकून आपटले. काम करीत राहिला - अपयश तेवढ्याच चिकाटीने मागे लागत राहिले.  अपयशी हिरो म्हणून नाव बदनाम झाले. पुन्हा परत कोलकात्त्याला जाण्याचे योजून बोडीया बिस्तारा बांधू लागला. आणि अचानक यशाचे दार धाडकन उघडले. जंजीर हीट झाला. तरी पण त्या काळात आम्हा मुलां मध्ये तो  कवी हरिवंशराय बच्चन ह्यांचा मुलगा म्हणून ओळखला जात होता कारण श्री हरिवंशराय ह्यांच्या कविता आम्हाला पाठयपुस्तकात होत्या. अमिताभ ने कुठे तरी सांगितलेली एक गोष्ट आठवते - संघर्षाच्या त्या कठीण काळात तो वरळी सी फेस वर चकरा मारायचा, तिथल्या बेंच वर बसून मका कणीस खात वेळ मारून न्यायचा, नंतर वरळी नाक्यावर असलेल्या सिटी बेकरी वर जाऊन बिस्किटे आणि केक खात उभा राहायचा - त्यावेळी बाजूला असलेल्या कुमकुम (आताचे नाव गीता) टॉकीज वर लागलेल्या राजेश खन्ना च्या चित्रपटाला उडालेली झुंबड आणि बुकिंग साठी उभ्या राहिलेल्या रसिकांची लांबच लांब रांग बघत उभा राहायचा आणि विचार करायचा माझ्या वाट्याला असे अफाट यश येईल का ? आणि कधी ? कधी?? कधी???

सात हिंदुस्थानी हा त्याचा पहिला चित्रपट. त्यानंतर त्याचे चित्रपट येत राहिले आणि पडत राहिले. "आनंद" चित्रपट आला. ह्या चित्रपटात त्याने फक्त ५००० रुपयात काम केले. ५००० रुपये त्यावेळी त्याची कोलकत्त्या मधल्या नोकरीमधला ३ महिन्याचा पगार होता! कारण त्याचा "आतला आवाज" सांगत होता की तुला इथेच काहीतरी करायचे आहे . "आनंद" मध्ये  जरी राजेश खन्ना भाव खाऊन गेला तरी उंच, शांत आणि गंभीर असणारा डॉक्टर भास्कर आणि शेवटी ज्यावेळी आनंद मारतो त्यावेळी ज्वालामुखीसारखा भडकणारा "बाबू मोशाय" डॉक्टर भास्कर पब्लिकच्या लक्षात राहिला. त्यानंतर त्याचे काही आणखी चित्रपट आले - महमूद ने त्याला "बॉंबे तो गोवा" मध्ये चान्स दिला. १९७३ ला "जंजीर" आला.  जंजीर नंतर एक वादळ बॉलीवूड वर पसरले - अँग्री यंग मॅन ह्या नावाने त्या वादळाने धुमशान मांडले - भले भले स्टार रुपी वृक्ष उखडले गेले - बॉलीवूड च्या तारांगणात एकच सूर्य तळपू लागला आणि बाकी सारे सितारे निष्प्रभ झाले. एके काळी रेडिओ सिलोन ने नाकारलेला आवाज अचानक भारदस्त असल्याचा साक्षात्कार इथल्या लोकांना झाला. पुढे "नमक  हराम" आला - तो पाहिल्यानंतर आमच्या पिढीची त्यावेळची प्रतिक्रिया होती कि " अमिताभ ने राजेश खन्ना ला कच्चा खाऊन टाकला". राजेश अमिताभ त्यानंतर एकत्र कधी दिसले नाहीत (नशीब चित्रपटाच्या गाण्याच्या एका सिक्वेन्स मध्ये दिले तेवढेच). त्यानंतर तो कामात अतिशय व्यग्र झाला. एके काळी वरळी सी फेस वर चकरा मारत वेळ कसा काढायचा हा प्रश्न त्यावेळी पडलेल्या अमिताभ ला आता दिवसाचे २४ तास पण कमी पडू लागले असतील. यशाच्या अफाट उंचीवर तो पोचला पण पाय जमिनीवर ठेवले. बॉलीवूड मध्ये यशाच्या शिखरावर असताना सेट वर दिलेल्या वेळी हजर असणारा तो एकमेव कलाकार असायचा. प्रोफेशनॅलिसम म्हणजे काय ते त्याने दाखवून दिले. आता हरिवंश राय बच्चन ह्यांना अमिताभ बच्चन चे वडील म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या मुलांच्या नावाने आपली ओळख करून दिली जावी अशी आई - बापाची इच्छा असते - अमिताभ ने ती पूर्ण केली. अमिताभ ला आपल्या वडिलांबद्दल अतिशय आदर होता. तो त्याच्या वागण्या बोलण्यातून - मुलाखतीत जेव्हा जेव्हा त्याच्या वडिलांचा उल्लेख येई तेव्हा तेव्हा तो आदर प्रकर्षाने जाणवत राहातो. त्यांच्या कविता जेव्हा अमिताभ सादर करतो तेव्हा वाटते कि खोल अर्थ असणाऱ्या हरिवंश राय ह्यांच्या कविता वाचण्यासाठी आणि सादर करण्यासाठी त्यांचा मुलगा अमिताभ ह्याचा गहिरा आवाज योग्य आहे ह्याची खात्री होते.

 1973 च्या जंजीर प्रदर्शित झाल्यानंतर चार दशकाहून जास्त काळ उलटला  - अमिताभ चे गारुड अजून तसेच आहे. मध्यंतरी तो कठीण कालखंडातून गेला. घरावर जप्ती यायची वेळ आली. रात्रीची झोप उडाली त्याची. परत कंबर कसून उभा राहिला. कदाचित कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही असे त्याने ठरवले असावे. चित्रपट असो, जाहिरात  असो, करोडपती सारखा प्रायोजित कार्यक्रम असो - सर्व त्याने स्वीकारले आणि यशस्वी करून दाखवले आणि त्याबरोबर स्वतः यशस्वी झाला. महानायक झाला. त्याच्या हि आयष्यात चढ उतार , सुख दु:ख, यश अपयश असे सर्व प्रसंग आले. सुरवातीला रेडिओ वर मिळालेला नकार, उंट आणि घोड्याचे तोंड असणारा लंबू नातं अशी झालेली हेटाळणी, नंतर मिळालेले अफाट यश, प्रेमाचा त्रिकोण, जीवघेणा अपघात, राजकारणात प्रवेश आणि तिथे मिळालेले अपयश, पुन्हा चित्रपट पण चुकीच्या निवडीमुळे अपयश, त्याच्या कंपनीचे वाजलेले दिवाळे, त्यातून पुन्हा चित्रपटाकडे आणि कौन बनेगा करोडपती सारख्या कार्यक्रमाकडे - पुन्हा वयाला साजेशे चित्रपट करण्याकडे आणि त्यानंतर प्राप्त केलेले स्थेर्य. तो सतत संघर्ष आणि प्रयत्न करत राहिला. त्याच्या ह्या संघर्षाचे मुळे आपल्या सारख्या सर्व सामान्यांना तो आपल्यातलाच एक वाटतो. त्याचे महानायक होणे असे सोपे न्हवतेच मुळी. एवढा मोठा होऊन हि " डाऊन टू अर्थ",  " सॉफ्ट स्पिकिंग", "सुसंस्कृत" अशी खास ओळख त्याने कायम ठेवली

असे मी कुठे तरी वाचले होते की  - सात हिंदुथानी जेव्हा रिलीज झाला होता त्यावेळी अमिताभ च्या उंची ची तर उडवणारे एक कार्टून त्यावेळी पब्लिश झाले होते - त्यात भारताचा नकाशा दाखवला गेला होता - त्यावर सहा हिंदुस्थानी झोपलेले दाखवले होते (पडेल चित्रपटाचे प्रतीक) आणि एक उंच माणूस (म्हणजे अमिताभ) मध्यभागी उभा दाखवला होता. १९६९-७० ला चित्रपटाची आणि अमिताभ ची टर उडवणारे हे कार्टून पुढे १९७३-७४ नंतर एक सत्य ठरले - त्यावेळी बॉलीवूड च्या साम्राज्यावर नव्हे तर पूर्ण हिंदूस्थानभर एकच उंच व्यक्तिमत्त्व ठळकपणे उभे होते आणि ते म्हणजे अमिताभचे. एका चॅनेल च्या अवार्ड फंक्शन मध्ये राजेश खन्ना ला अमिताभ हस्ते " लाईफ अचिव्हमेन्ट अवार्ड" देण्यात आले. बर्याच दिवसांनी त्यांना एकत्र स्टेज वर पाहायला मिळाले. त्यावेळी भावूक झालेल्या राजेश ला जुने स्पर्धेचे आणि त्याचे सोनेरी दिवस नक्कीच आठवले असतील - एके काळी तो सुपरस्टार होता आणि अमिताभ आता महानायक होता. टाइम हॅज चेंज्ड. पालटलेले दिवस आणि पलटलेली वेळ त्याने अनुभवली होतीच  - त्या एके काळी सुपरस्टार असताना त्याला अमिताभ चे वर्चस्व मान्य झाले नसेल, पण वेळ बदलत असते, प्रत्येकाचे दिवस येतात आणि जातात. सुपरस्टार पद मिळाल्यावर राजेश स्वतःला देव समजू लागला होता. तो स्वत:च म्हणाला होता " वयाच्या २१-२२ व्या वर्षी मी एवढा प्रसिद्ध झालो, लोक- मुली माझ्याचसाठी वेडे झाले होते, माझाच सर्वत्र उदो उदो होत होता, त्यामुळे मला मी खरोखर देव झाल्यासारखेच वाटायला लागले होते".  यश हातात आल्यावर अमिताभ बहकला न्हवता - यशाची नशा त्याच्या डोक्यात गेली न्हवती.  कदाचित अमिताभ च्या मनात गुरु दत्त च्या "  कागज के फूल" ची कथा खोलवर रुतून बसली असावी. इथले यश तकलादू आहे, इथली दुनिया बेगडी आहे, इथे फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतात आणि मावळत्या सूर्याकडे पाठ करतात ह्या सर्वाची त्याला जाणीव असावी आणि सुरुवातीला जे टक्के टोपणे खाले त्यामुळे तो अधिक मॅच्युयर झाला असावा. फक्त ठराविक सहकलाकारांशी मैत्री कायम ठेवत बॉलीवूड च्या ह्या झगमगत्या दुनियेत त्याने अलिप्तपणा जपला. लाईफ अचिव्हमेन्ट च्या अवार्ड फंक्शन च्या वेळी राजेश ला मागचे दिवस आठवले असतील. समारोप करताना अमिताभ कडे आणि प्रेक्षकांकडे  बघत तो म्हणाला होता " कल जहाँ मैं था वहा आज कोई और हैं - कल जहाँ मैं था वहा आज कोई और हैं  - वो भी एक दौर था ये भी एक दौर है"

"आतला आवाज" ऐकून त्याचा ध्यास घेणारे लोक कमी असतात - व्यवहाराच्या शुष्क रगाड्यात प्रायोरिटी बदलतात आणि हा आतला आवाज मागे पडतो आणि शेवटी दबून जातो.  काही लोक ह्या "आतल्या आवाजाने" जे सांगितले आहे ते करण्याचा ध्यास घेतात - त्याचा पाठपुरावा करतात आणि असे केल्याने जे काही साकार होते त्याचा अविष्कार महान असतो. अमिताभ ने ते साध्य केले आणि तो महानायक झाला.