Wednesday, 16 September 2015

गणपती बाप्पा मोरया ...

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. ब्रिटीश काळात स्वातंत्र्या बद्दल जागृती निर्माण करण्यासाठी जनमाणसाना एकत्र आणण्याचा त्यांचा उद्देश होता. गणेशोत्सव जनमानसात रुजला - लोकमान्यांनी ज्या हेतूने चालू केला तो सफल झालाच पण ह्या उत्सवामुळे एक नवचैतन्य लोकमानसात निर्माण झाले.

कोकणात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात गणपती उत्सव साजरा होतो. त्याची लगबग श्रावणातच - नागपंचमी पासून चालू होते. कोणत्याही परिस्थितीत चार दिवस सुट्टी काढून कोकणी माणूस गावाकडे ह्यासाठी हजर होतोच. पाच दिवसाच्या ह्या सोहोळ्यात तन मन धन अर्पून सामील होतो. मूर्ती सांगणे, गणेश स्थापना करणे, आरत्या, भजने - मोठा थाट उडून जातो. वातावरण उत्साहवर्धक असते, सर्वत्र हिरवळ पसरलेली असते, हिरवीगार भातशेती उभी असते, परसात मांडवावर काकड्या, टरबूज, चिबूड झुलत असतात, पावसाच्या सरी मधून मधून पडत असतात, वहाळ - विहिरी पाण्याने भरलेली असतात आणि गावातील सर्व घरे बाया बापड्यानी भरलेली असतात.  कुटुंबातल्या सर्वाना एकदम एकाच वेळी सुट्ट्या घ्यायला जमत नसेल त्यामुळे काही जणांनी सण साजरा करण्याच्या सोयीसाठी  "वर्सल" पद्धत सुरू केली असावी. सर्वच कार्ये ह्या दरम्यान एकदिलाने केली जातात; विसर्जन पण एकदम जोशात केले जाते; पण विसर्जन करून घरी परतल्यावर गणपतीविना असलेला मंडप पाहिल्यावर सर्व जोश ओसरून जातो. पाच दिवसात न आठवलेल्या कामाच्या गोष्टी, नोकरी धंद्याच्या कटकटी पुन्हा डोकी वर काढतात.आणि पुन्हा रुटीन सुरू होते ते सरळ थांबते ते पुढील वर्षीच्या गणपती उत्सवापर्यंत! गणेश उत्सव हा दर वर्षी असा येत रहातो - उत्साहाचे उधाण आणत रहातो - आणि चाकरमानी तो तेवढ्याच नेमाने आणि जोमाने साजरा करतो. हा जोम, हे उधाण, हा जोश आणि हे चार दिवस पुढच्या वर्षभरात येणार्या उरलेल्या दिवसांना सामोरे जाण्याचे , संघर्ष करण्यासाठीचे उर्जा स्त्रोत देवून जातात

उद्या श्री गणेशाचे आगमन होत आहे - वरदविनायक, चिंतामणी, विघ्नहर्ता गणपती सर्वांची विघ्ने दूर करो, योजिलेले कार्य सिद्धीस नेवो, सर्वाना सदबुद्धी देवो आणि जीवन मंगलमय करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...  

गणपती बाप्पा मोरया ...

Saturday, 5 September 2015

कृष्ण आठवताना

आज कृष्ण जन्म दिवस सर्वत्र साजरा होत आहे. कृष्णाचे चरित्र एवढे महान आहे की ते भारतीय संस्कृतीला व्यापून दशांगुळे वर उरले आहे. आज, आपण  भारत महासत्ता होईल किंवा होणार आहे म्हणून स्वत: ची पाठ थोपटून घेत आहोत. कृष्णा सारखे व्यक्तिमत्व आज असते तर आज भारत नक्कीच एक सशक्त देश बनून राहिला असता. आजच्या ह्या दिवशी कृष्णाच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेणे उचित ठरेल
कृष्ण कैदेत जन्मला - काळरात्र होती तेव्हा. गोकुळात वाढला - मथुरेत गेला आणि शेवटी द्वारकेला स्थायिक झाला. तो सतत पुढे जात राहिला. त्याने मागे वळून पाहिले नाही. द्वारकेतून त्याला परत गॊकुलात यायला मिळाले नसावे आणि त्याबद्दल त्याने कधी खंत व्यक्त केली नाही.   तो एक आदर्श गोप होता, गवळी होता, एक एक राजपुत्र होता, राजा होता, एक सारथी होता  आणि एक सम्राट होता; तो एक आदर्श सखा होता, पुत्र होता, भाऊ होता, एक विद्यार्थी होता, एक प्रेमी होता, एक पती होता, एक मामा होता, एक काका होता, एक पिता होता. प्रत्येक भूमिकेत त्याने प्राण पणाने जीव ओतला आणि प्रत्येक नात्याचे कर्तव्य मनापासून पार पाडले . ज्या ज्या क्षणी तो ती ती भूमिका जगला त्या त्या क्षणी तो त्या क्षणाचा, त्या माणसांचा होवून जगला आणि ज्या क्षणी तो त्या भूमिकेतून बाहेर पडला त्या त्या क्षणी तो त्या सर्वापासून अलिप्त झाला. पार्या सारखा - पारा धातूबरोबर मिसळला कि त्या धातूबरोबर एकजीव होवून जातो - एवढा कि पार्याचे अस्तित्व राहत नाही पण जेव्हा धातूपासून पारा वेगळा होतो तेव्हा तो हाती लागत नाही -निसटून जातो. कृष्ण असाच पार्यासार्खा जीवनातल्या मोह्मायेतून निसटला.

आपल्या जबाबदार्या पार पाडताना त्याने नाते संबंधाचा वापर केला. पण कर्तव्याला प्राधान्य दिले. द्वारकाधीश असताना गरीब बालमित्र सुदामा ला बरोबरीने वागवले  अभिमन्यु त्याचा भाचा होता पण त्याला चक्रव्यूह भेदण्यासाठी पाठवण्याचा कठोर निर्णय त्याला मामा असून घ्यावा लागला. भीमपुत्र घटोत्कचाला युद्ध्वेदीवर कर्णाचे अस्त्र निष्प्रभ करण्यासाठी पाठवावे लागले . कर्णाला आपल्याकडे आणण्यासाठी द्रौपदी चे आमिष दाखवण्याची उठाठेव त्याला करावी लागली. युद्ध होणार ह्याची खात्री असताना - किंबहुना युद्ध करायचे असा स्वत: चा निर्णय असताना - हे युद्ध कौरवांनी लादले असे दाखवण्यासाठी कृष्ण शिष्टाई करण्याचे धाडस त्याला कौरवांच्या दरबारात जावून करावे लागले .   शिशुपाल आणि दुर्योधनाला मारण्यासाठी युक्ती आणि क्लृप्त्या वापराव्या लागल्या - शक्ती कमी पडते तेथे युक्त्या आणि अवती भवती असलेल्या लोकांची मानसिकता त्याने अचूक ओळखली आणि आपले ध्येय प्राप्तीसाठी त्याचा वापर करून घेतला. 

कृष्ण प्रजासत्ताक राज्य पद्धतीचा पुरस्कर्ता होता. कंसाला त्याने मारले - शिशुपालाला मारले - जरासंधाला मारले पण त्यांचे राज्य हस्तगत नाही केले ते त्यांच्या वारसांच्या स्वाधीन करून स्वत:  मोकळा झाला. प्रजासत्ताक राज्यासाठी तो पांडवा साठी लढला - सम्राट होता - सारथी झाला. तो  विरक्त होता - जीवनाची क्षणभंगुरता तो जाणून होता तरीही सोन्याची द्वारका त्याने उभी केली आणि ती बुडताना तेवढ्याच आलिप्त वृत्तीने पाहिली   

कर्म सिद्धांता वर त्याचा ठाम विश्वास होता. त्याची स्वत:ची मूल्ये पण अशीच पहाडासारखी ठाम होती ज्यावर तो कायम पक्का राहिला. तो मुत्सद्दी होता, मनकवडा होता - समोरचा माणूस कोणत्या परिस्थितीत कसा वागणार हे तो सहज जाणू शकत असे. कठीण परिस्थितीत यशस्वी माघार घेण्यात त्याने कमीपणा मानला नाही पण शत्रू जेव्हा त्याच्या कचाट्यात सापडला तेव्हा शत्रूला त्याने माफ केले नाही. त्यामुळे तो यशस्वी राजकारणी झाला. राजसूय यज्ञाचे यजमानपद जेवढ्या मानाने स्वीकारले तेवढ्याच सहजतेने गांधारीचा शाप स्वीकारला. स्वत: योगेश्वर होता पण आजूबाजूला कोणीही सहृद नसलेला वनातला एकाकी  मृत्यू आपलासा केला - त्या बाण मारणार्या पारध्याला कोणताही  दोष न देता!

मी वाचलेल्या वेगवेगळ्या साहित्यकृतीतून मला कृष्ण जसा दिसला तसा तो मी येथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कृष्ण समजून घेणे सोपे नाही - पण त्याचे गुण, त्याची वृत्ती, त्याची वागणूक पुन्हा एकदा आठवून आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात करण्याची आजची गरज आहे.